शुक्रवार, ३ फेब्रुवारी, २०१७

हवे पंख नवे - नाटक

हवे पंख नवे
‘जो समाज इतिहास विसरतो तो समाज इतिहास घडवू शकत नाही' याचा अर्थ इतिहासातील चूका पराभव विजय यांची उजळणी करत भविष्याचा वेध घेत वर्तमानात सजगपणे व्यवहारनीती ठरवायची असते.सध्याच्या काळात आंबेडकरी चळवळीत काहीशी उदासीनता अन विस्कळीतपणा आलेला आहे.स्वस्वार्थाच्या राजकीय सोयीसाठी ऐतिहासिक अपयश अपमान पराभव विसरून लाभाचा गरम केक खाण्याची अहमिका लागलेली आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर एखाद्या दैवताप्रमाणे जपण्याची नवीच घातक सवय जडू पाहते आहे.बाबासाहेब त्यांचे विचार डोक्यात घ्यायचे की डोक्यावर असा प्रश्न निर्माण झालेला हा काळ.
अशा या काळात आपल्याला पुन्हा बाबासाहेब अनुभवता आले तर? एकीकडे अडवणूक अनन्वित अत्याचार हत्या,अन संरक्षणासाठी असणारे कायदे मोडून काढण्याचे षडयंत्र दुसरीकडे त्याच लोकांसोबत अभद्र राजकीय युती.राजकीय शहाणपणाचा अभाव.अशी आजची ही दुर्दैवी परिस्थिती पाहून बाबासाहेबांना काय वाटलं असतं?
या प्रश्नांचे थैमान आंबेडकरी चळवळीतील कुणाही संवेदनशील माणसाच्या डोक्यात घोंघावत असणार.त्याला मुर्त स्वरुपात रंगमंचावर आणण्याचा एक आगळावेगळा असा अविस्मरणीय कलाआविष्कार बोधी नाट्य परिषद यांच्या माध्यमातून सादर करण्यात येत आहे..
जेष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांच्या “हवे पंख नवे”या काव्यमय कादंबरीवर आधारलेली तब्बल २ तास ५० मिनिटाची ही एक महानाट्यकाव्यांबरी.”हवे पंख नवे”याच नावाने निर्मित केली गेली आहे.
सदर दोन अंकी नाट्यकलाकृती मागे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार हा मुख्य हेतू असून त्या अनुषंगाने त्यांच्या खाजगी आयुष्यातील अतिशय नाजूक अशा काही गोष्टीही हळुवारपणे उलगडून त्या सामान्य जनमानसात विचारार्थ पुढे ठेवलेल्या आहेत.आंबेडकरी अनुयायीच नव्हे तर इतर समाजातील प्रेक्षकांनीही हे अकथित बाबासाहेब समजून उमजून घ्यायला हवेत.काही लोकांनी यावर आक्षेप घेतला होता.मात्र योग्य संदर्भासहित उत्तम सादरीकरण आणि परिणामकारक संवादातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या आजवरच्या जनमानसातील उत्तुंग प्रतिमेला यत्किंचितही गालबोट लागू देत नाहीत.
याचे जबाबदारीयुक्त भान लेखक दिग्दर्शकानी बाळगल्याचे ठळकपणे जाणवते.त्यातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणखी लख्खपणे बावनकशी सोन्याप्रमाणे उजळून निघतात.याचे श्रेय अर्थात लेखक प्रेमानंद गज्वी आणि दिग्दर्शक अशोक हांडोरे यांना जाते.
डॉ.बाबासाहेबांचा जीवनप्रवास आणि सिंधू संस्कृती मोहेंजो दाडो ते स्वातंत्र्य अन भारतीय संविधान निर्मिती,धर्मांतर असा आठ हजार वर्षापूर्वीचा इतिहासाचा पट उलगडणे तसे ही आव्हानात्मक बाब. मात्र लेखक दिग्दर्शकानी हे आव्हान समर्थपणे निभावले आहे. त्यांना तेवढीच भक्कम साथ दिलीय यातील कलाकारांनी.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेत विक्रांत शिंदे आहेत.अनेकदा आपण पाहतो बाबासाहेबांची भूमिका करताना कलाकारास अनेक दिव्य प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते.भल्याभल्यांना ते जमत नाही.जब्बार पटेलांच्या चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार मामुटीने कठोर परिश्रमपूर्वक अभ्यास आणि स्वतःच्या व्यक्तीमत्वात बदल केले होते हे आपण जाणतोच.त्याचप्रकारे अत्यंत ताकदीने विक्रांत शिंदे यांनी बाबासाहेब अक्षरशः जिवंत उभे केले आहेत.एक क्षण आपण थेट बाबासाहेबांनाच अनुभवतो आहोत असे वाटून जाते.अत्यंत समरसून त्यांनी भूमिका केलेली आहे. उच्चविद्याविभूषित व्यासंगी बाबासाहेब आणि त्यांचे वैचारिक तत्वज्ञानात्मक संवाद पाठ करून सफाईदार संवादफेक आवाजातील चढउतार देहबोली हातांची लयबद्ध हालचाल याद्वारे विक्रांत शिंदे मूर्तिमंत बाबासाहेब साकारतात.ते अनुभवताना त्यात कुठेही कृत्रिमता जाणवत नाही सुरुवातीला पुतळ्यातून बाहेर येणारे बाबासाहेब शेवटी पुतळ्यात परततात या प्रवासात कुठेही रटाळपणा जाणवत नाही.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यात येवून गेलेल्या तीन स्त्रिया अन त्यांच्याशी असणारे डॉ.बाबासाहेबांचे निष्कलंक नीतिमान आदरयुक्त व्यवहार हे आदर्शवत अन अनुकरणीय असेच आहेत.अनुषंगाने एकूणच पुराणकाळापासून आजपर्यंतच्या स्त्रियांचं दु:ख वेदना मांडून त्यांना त्या स्थितीत ढकलणाऱ्या समाजव्यवस्थेलाच “जगातला कोणता भाषातज्ञ तुमच्या सन्मानासाठी नवा शब्द घडवेल? असा रोकडा प्रश्न या कलाकृतीद्वारे विचारलेला आहे. डॉ.बाबासाहेब हे आधुनिक भारताचे शिल्पकार अन भारतीयांना गुलामीतून मुक्त करणारे मार्गदाते उद्धारक जरी असले तरी तेही शेवटी एक माणूस होते.त्यांनाही सर्वसामान्य माणसांप्रमाणे हळवं मन होतं विरह प्रेम भाव भावना होत्या अन त्यातूनही सर्वात महत्वाचं होतं लोकांची दु:खे,स्वातंत्र्य, देशाचे हित या सर्वांचा समग्र आढावा हे नाटक घेते.नाटकात ओघाने येणारे अतिशय बारीक तपशील अभ्यासपूर्वक योजले आहेत ते पाहताना थक्क व्हायला होतं.अन नकळत आपण लेखकाच्या व्यासंगास दाद देवून जातो.काही प्रसंगी डोळे भरून येतात.तरी काही प्रसंगी हास्याचा शिडकावाही होतो.दुसऱ्या लग्नाच्या प्रसंगी अनमोल घडी (१९४६) चित्रपटातील
जवां है मोहब्बत हसीन है ज़माना लुटाया है दिल ने खुशी का खज़ाना
या गीताचा अतिशय चपखल वापर केला आहे.मात्र त्याची लांबी अनावश्यक वाटते.
रमाई आंबेडकर यांच्या भूमिकेत स्नेहल थाटर असून त्यांनी रमाईची प्रेमळ अन समाजाभिमुख तगमग अतिशय प्रभावीपणे साकारली आहे.फॅनीची भूमिका प्रियांका पाठारे यांनी लक्षणीय केली आहे.प्रणाली गणवीर यांनी सविता आंबेडकर यांची भूमिका उत्तम वठवली आहे.शाहू महाराजांच्या भूमिकेत निखिल जाधव चपखल.अलोक जाधव यांचा गांधीजी आणि सुनिल थोरात यांचा फाईल फेकणारा शिपाई लक्षात राहतात.हेच कलाकार पुन्हा कार्यकर्ते म्हणून वेगळ्या भूमिकेत.त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या भूमिका अतिशय जिद्दीने आणि मेहनतीने निभावल्या आहेत.सर्वांचं टायमिंग आणि संवाद पाठांतर प्रेक्षकांची मिळणारी उत्स्फूर्त दाद त्या सर्वांचे चीज करून जाते.
नाटकाचा घाट हा पथनाट्यप्रकार असल्यामुळे इतर नेपथ्याचा वापर केलेला नाही.यामुळे हे नाटक इतर ठिकाणी ऑन डिमांड कुठेही सादर करण्याची सोय लक्षात घेतलेली आहे. संवाद अन इतर मुमेंटसाठी प्रभावीपणे पोहोचण्यासाठी प्रकाश योजना आणि पार्श्वसंगीताचा परिणामकारक वापर प्रेक्षकांना खिळवून ठेवतो.
प्रत्येक आंबेडकरी हितचिंतक चळवळीतील कार्यकर्ता यांनी हे नाटक अन त्यातील विचार डोक्यात घेणे अन यासाठी समाजालाच पुन्हा बाबासाहेबांची भेट घडवून आणणे गरजेचे आहे.त्यामुळे या नाटकाचे अधिकाधिक प्रयोग व्हायला हवेत.
लोकांचा आग्रह असेल तर आम्ही हे नाटक कुठेही सादर करू असे दिग्दर्शक अशोक हंडोरे यांनी कळवले आहे.
त्याचा समाजात प्रचार प्रसार व्हावा ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी.
- मिलिंद धुमाळे


पूर्वप्रकाशित - दैनिक जनतेचा महानायक 18-02-2017

Translate