dr b r Ambedkr babasaheb father of the modren nation india लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
dr b r Ambedkr babasaheb father of the modren nation india लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, १३ एप्रिल, २०१६

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचे गुरु क्रांतिसूर्य ज्योतीबा फुले यांनी चालविलेली सामाजिक उत्थानाची परिवर्तनाची चळवळ शेवटच्या टप्प्यात आणून तीस एक आयाम दिला आणि खऱ्या अर्थाने घटनेच्या माध्यमातून ती यशस्वी केली.हिंदू धर्म नाकारून गुरूने सावर्जनिक सत्यशोधक धर्माची तर शिष्योत्तमाने बौद्ध धम्माची स्थापना केली.अलीकडे देशात ब्राह्मण्य ब्राह्मणवाद हिंदुत्व असे शब्द प्रचलित आहेत,सामान्य नागरिकांना हे समजण्यास कठीण होते.तर हे सर्व शब्द आणि त्यांची एका साध्यासोप्या शब्दांत व्याख्या करायची असेल तर “मनुवाद” अशी ती केली पाहिजे.हा शब्द कसा योग्य आहे याची आपण माहिती घेऊ.मनु ऋषीने जो मनुस्मृती नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्यात ब्राह्मण समाजास अवास्तव आणि अवाजवी असे भरमसाठ अधिकार दिले. याद्वारे ब्राह्मण समाजाने आपल्या भोवती एक अभेद्य अशी तटबंदी निर्माण करून घेतली नियम बनवले त्यास धर्माचे नाव दिले.वेद श्रुती पुराणे अरण्यके सगळीकडे ब्राह्मण गौरव आणि श्रेष्ठत्वाचे उल्लेख आहेत.ब्राह्मणोऽस्य मुखमासीद बाहू: राजन्य:कृत:ऊरू तदस्य यदवैश्य पद्धयां शूद्रो अजायत “ हा पुरुषसूक्तातील श्लोक आहे.जो प्रत्येक पूजेत आवर्जून भटजीद्वारे म्हटला जातो.त्याचा अर्थ असा- ब्राह्मण  मुखातून क्षत्रिय बाहुंपासून वैश्य मांड्यापासून आणि शुद्र पायांपासून निर्माण झाले. त्यामुळे आजही वेद आणि मनुस्मृतीचे गोडवे गायले जातात.
मुळात देश स्वतंत्र झाल्यापासून आणि इथे लोकशाहीभिमुख राज्यघटना अंमलात आल्यापासून ते व्यवहारात नाहीत त्यामुळे आजवर कुणाचे काहीही अडले नाही.कालविसंगत असूनही काही लोकांना ते पुन्हा पुन्हा इथे रुजविण्याची हुक्की येते,राज्यघटना नाकारून मनुस्मृती लागू करावी असे वाटते.त्यामागे हिच श्रेष्ठत्व मिरविण्याची भावना आहे.बाबासाहेबांनी रिडल्स इन हिंदूइझम आणि शुद्र पूर्वी कोण होते ? हे दोन ग्रंथ  लिहिले ज्योतीबांनी शेतकर्यांचा आसूड आणि ब्राह्मणांचे कसब लिहिले,ब्राह्मणांचे कसब हे पुस्तक फुल्यांनी महाराष्ट्र देशातील कुणबी माळी महार मांग या लोकांस अर्पण केले.त्यांनी प्रस्तावनेत केलेला उल्लेख आजही  किती चपखल आहे हे वाचून लक्षात येते,”या लहानशा चोपडीस प्रस्तावना लिहिण्याची गरज नाही.आमच्या देशांत ब्राह्मणांचे महत्व किती आहे  व ते धर्माच्या मिषाने लोकांवर केवढा जुलूम करतात हे प्रसिद्धच आहे.असे असता कोणी म्हणतील कि हे पुस्तक रचण्याचे कारण काय?तर त्यास असे उत्तर आहे कि,ब्राह्मण आपला कावा सर्व लोकांसी सारखा चालवीत नाहीत.कुणबी माळी वगैरे शुद्र लोकांत त्यांचे भटपण फार चालते.आणि ते इतर जातींच्या आणि विशेषकरून सांप्रतकाळच्या सुधारलेल्या लोकांस फारसे ठाऊक नाहीत.जे विद्या शिकून सुधारले आहेत.त्यांच्यामध्ये भटजीबुवांचे महात्म्य दिवसानुदिवस कमी होत चालले आहे.परंतु अशी गोष्ट शुद्र जातींत नाही.तेथे अद्यापि बाजीरावाच्या वेळची भटशाही राज्य करीत  आहे.”
बाबासाहेबांनी या ब्राह्मण्याची व्याख्या केलीय.”जन्मजात उच्चनीच भाव” बाबासाहेब आपल्या बहिष्कृत भारत मधील अग्रलेखात म्हणतात.आंग्लाई आणि ब्राह्मणाई या हिंदी जनतेच्या अंगाला लागलेल्या जळवा आहेत.व त्या एकसारख्या हिंदी जनतेच्या रक्ताचा शोष करीत आहेत.आंग्लाई सत्तेने देहाने लोकांना  गुलाम बनविले तर  ब्राह्मणाईने लोकांच्या आत्म्याला गुलाम करून ठेविले आहे.ब्राह्मण लोक सर्व प्रकारच्या चळवळीत धडाडीने भाग घेतात.राजकीय चळवळ हे तर त्यांचे जीवनच आहे.एकवेळ जेवण नाही मिळाले तरी चालेल परंतु राजकारणाच्या ताकाचा एखादा भुरकाजर त्यांना मिळाला नाही तर त्यांना अमांशाची पीडा होण्याचा संभव असतो.सामाजिक सुधारणेच्या चळवळीत हि त्यांचे अंग असते.विधवा विवाह बालविवाह केशवपन वगैरे सामाजिक प्रश्नांसंदर्भात त्यांनी आस्था दाखवली आहे.मजूर वर्गाच्या वतीने भांडवलशाहीवाद घालणाऱ्या चळवळीचे ते पुरस्कर्ते होऊ शकतात.नव्हें तर बोल्शेविझम व कम्युनिझमसारख्या आर्थीक हितसंबंधात क्रांती घडवून आणणाऱ्या चळवळी या देशात आणून त्या पाडाला लावण्यास ब्राह्मणच कारणीभूत झालेले आहेत.”
अर्थात तात्पर्य असे कि ब्राह्मणवादी शोषण व्यवस्था निर्माण करणारे जरी ब्राह्मण असले तरी त्यातही काही सुधारणावादी लोक होते.त्यासर्वांना एकत्र घेऊन बाबासाहेबांनी सामाजिक क्रांती केली.आणि यासाठी सर्व धर्मीय आणि सर्व जातीय घटकांना भारतीय राज्यघटनेत समानता बहाल केली.यापुढे देशात होणाऱ्या  कोणत्याही चळवळी या सर्व घटकांना सोबत घेऊन सर्वसमावेशक अशी वाटचाल करतील तर यशस्वी होतील.नाहीतर त्यात फुटीरतावादी वृत्ती वाढीस लागून ती क्षीण होईल आणि उन्मळून पडेल.
अलीकडे हा ब्राह्मणवाद त्याच विचाराचे सरकार आल्यापासून अधूनमधून डोके वर काढतो आहे.
बाबासाहेबांनी अनुयायांना नितांत सुंदर असा बुद्धाचा धम्म दिला आहे.

प्रज्ञा शील करुणा हि त्याची वैशिष्ट्ये आहेत.बुद्धाने मध्यम मार्ग सांगितला त्यावर आपण  चालले पाहिजे. त्याही पुढे बाबासाहेब म्हणतात मी प्रथम भारतीय आहे आणि अतंत:हि भारतीय आहे.हे आंबेडकरी अनुयायांनी नेहमी लक्षात ठेवले पाहिजे.आपला धम्म आपल्या उंबऱ्याच्या आत असला पाहिजे आपण घराबाहेर पडतो तेव्हा आपण फक्त भारतीय असतो.आपले आचरण नैतिकदृष्ट्या स्वच्छ असले पाहिजे.आपण आंबेडकरांचा आदर्श सांगतो तेव्हा आपले वागणे सुद्धा तसेच असले पाहिजे त्यांच्या विचारांना गालबोट लागणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे.इतर समाज कसे सण साजरे करतात यावर टीका करण्यापेक्षा सामाजिक सौहार्दता वाढविण्यास आपणही मदत केली पाहिजे.आंबेडकरी तत्वज्ञान समता स्वातंत्र्य बंधूता आणि न्याय चार सूत्रावर आधारभूत आहे.त्यासाठी आपण झटले पाहिजे.देशातिल सर्व समाज घटकांना न्याय देण्याची आणि सुखी समृद्ध करण्याची ताकद आंबेडकरी तत्वज्ञानात आहे.त्यामुळे आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत निर्माण करण्यासाठी सर्वांनी प्रामाणिकपणे योगदान दिले पाहिजे.आपले सामाजिक दायित्व पार पाडले पाहिजे.तीच खरी बाबासाहेबांच्या विचारांची जयंती असेल.


- मिलिंद धुमाळे 
- पूर्वप्रकाशित दैनिक सकाळ २०१६ 


सोमवार, ११ एप्रिल, २०१६

महात्मा ज्योतिबा जोतीबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर (A)

महाराष्ट्र हा फुले-शाहू-आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो.
कारण महाराष्ट्राला या तीन थोर समाज सुधारकांचा वैचारिक वारसा लाभला आहे.विषमतेत बरबटलेल्या महाराष्ट्राची विस्कटलेली सामाजिक घडी बसवली ती या तिघांनी.
क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले आणि भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नातं हे गुरु-शिष्याचं नातं आहे.बाबासाहेबांनी तीन गुरु केले तथागत भगवान गौतम बुद्ध संत कबीर आणि महात्मा जोतीबा फुले.या तिघांचे वैशिष्ट्य हे कि तिघांनीही दैवावाद नाकारला.ब्राह्मणवादाचा कडाडून विरोध केला.
बाबासाहेबांनी त्यांचा वैचारिक वारसा पुढे चालविला.
महात्मा जोतीबा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्त्रीवर्गाविषयी अतिशय संवेदनशील होते.हि संवेदनशीलता केवळ मानवीय दृष्टीकोनातून आलेली नसून त्यात पितृत्वाची छाया आहे.
पेशवाईचा काळ १८१८ ला संपलेला असला तरी पेशवाईने दिलेली वैशिष्ट्ये समाजात तशीच रुजलेली होती.
फुले दांपत्यांचे आगमन पेशवाईनंतरचे, परंपरेने चालत असलेल्या रुढीप्रिय बुरसटलेल्या सामाजिक व्यवस्थेत ब्राह्मणातील विधवा स्त्रियांचे केशवपन ,विधवा विवाह ,जरठ कुमारिका विवाह ,सती प्रथा, बेकायदेशीर संतती व तिची भ्रुणहत्या इत्यादी चालूच होते त्याविरुद्ध जोतीबांनी अविरत संघर्ष केला.आपल्यापेक्षा वयाने कितीतरी मोठा असलेला जरठ नवरा वृद्धपकाळाने वारल्यानंतर घरातीलच कुणाकडून तरी दिवस गेलेल्या बाल विधवेचे बाळंतपण करण्यासाठी त्यांनी त्यावेळी भारतातील पहिले प्रसूतीगृह काढले.त्याचबरोबर अनाथ आश्रम देखील काढले ज्यात विधवा बाळंतीण आणि तिचे मूल देखील रहात असे.भारतातील पहिली मुलींची शाळा आणि अस्पृश्य समाजासाठी शाळा काढली.आयुष्यभर ब्राह्मणवादाशी संघर्ष करणाऱ्या फुले दांपत्यानी आत्महत्या करायला निघालेल्या आणि ब्राह्मण असलेल्या विधवा काशीबाई यांना त्यापासून परावृत्त करून बाळंतपणानंतर त्यांच्या मुलाला ”यशवंत”ला दत्तक घेतले.यावरून त्यांची सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि नेणीव किती उच्चकोटीची होती याचा प्रत्यय येतो.त्याकाळच्या सनातनी लोकांनी फुले दांपत्याचा अनन्वित छळ केला होता.एकदा तर चिडून त्यांनी मारेकरीसुद्धा पाठवले होते.आजच्या काळात जसे मॉर्निंगवॉकला मारतात किंवा  जायला सांगतात तसे, तर आश्चर्य म्हणजे माणूसकी दाटून आली ती सुपारी दिलेल्या मारेकऱ्यासच त्याने जोतीबांचे कार्य पाहिले त्यांचा नम्र विनयशील स्वभाव अनुभवला  आपण एका सज्जन भल्या माणसाला विनाकरण मारणार होतो याचा त्याला पश्चताप झाला.पुढे हाच मारेकरी धोंडीराम कुंभार जोतीबांच्या मार्गदर्शना खाली पंडीत झाला.
जोतिबांनी सावित्रीमाईना बरोबर घेऊन १ जानेवारी १८४८ रोजी पुण्याच्या भिडे वाड्यात मुलींसाठीची पहिली शाळा काढली.बहुजन समाजातील अस्पृश्यांना आणि विशेषतः स्त्रियांना शिक्षण मिळावे असा त्यांचा आग्रह होता.याच शाळेत ज्ञानाचे बाळकडू घेत शिकत असलेल्या अवघ्या अकरा वर्षाच्या मुक्ताबाई साळवे या विद्यार्थ्यीनीने एक निबंध लिहिला होता.निबंधाचे शिर्षक “महारा-मांगाच्या दु:ख विषयी “ असे असून त्यात मुक्ताबाई लिहिते “वेद तर ब्राह्मणांचा मक्ता आहे.ब्राह्मणांनीच त्याचे अवलोकन करावे.यावरून उघड दिसते कि महारा-मांगांना धर्म पुस्तक नाही.वेद जर ब्राह्मणांसाठी आहेत तर त्यांच्याप्रमाणे बरहुकूम वर्तवणूक करणे हा ब्राह्मणांचा धर्म आहे.आम्हाला जर धर्म पुस्तक नाही ते पाहण्याचा अधिकार नाही तर आम्ही धर्मरहित लोक आहोत असे साफ दिसते कि  नाही बरे?” स्त्री शिकली कि तीला आत्मभान येते.गुलामीविरुद्ध ती बंडखोरी करते.मुक्ताबाई साळवे हे त्याचे ज्वलंत उदाहरण.
बाबासाहेब आयुष्यभर समाजातील दुर्बल वंचित शोषित घटकांच्या शिक्षणासाठी न्याय हक्कांसाठी संघर्षरत राहिले.जोतीबांचा वैचारिक वारसा पुढे चालवत त्यांनी भारतीय स्त्रीला घटनेत स्थान दिले.समानतेचा दर्जा  बहाल केला.तिच्यासाठी हिंदू कोड बिल लिहिले. ”न स्त्री स्वातंत्र्यम महर्ती” म्हणत मनूने स्त्रीवर्गास हजारो वर्षे गुलामगिरीच्या खाईत लोटले होते.या अंधारयात्रेत भारतीय स्त्री आपल्या सामाजिक आर्थिक राजकीय आणि सांस्कृतिक बाबीमध्ये परावलंबतेशिवाय काहीही प्राप्त करू शकली नाही.बाबासाहेबांनी “हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनिती” हा निबंध लिहिला.त्याचे पुढे पुस्तक प्रकाशन केले.हा निबंध म्हणजे स्त्री मुक्तीचा जाहीरनामा जो पुढे हिंदू कोडबिल रूपाने अवतरला.क्रातीबा जोतीबा फुलेंचा वैचारिक वारसा पुढे रुजवत त्यांनी स्त्रियांना घटनेच्या माध्यमातून हक्क अधिकार दिले.पुरुषप्रधान मनुस्मृतीने स्त्रियांना नाकारलेले अधिकार भीमस्मृतीने प्राप्त करून दिले.आजची स्त्री हि अनेक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम करते आहे.आपला ठसा उमटवते आहे.आज असे कोणतेही क्षेत्र नाही काम नाही कि ते करण्यास स्त्रिया असमर्थ ठरतील.आज आधुनिक स्त्री हि यशाच्या शिखरावर आहे.स्त्री शिकली कि संपूर्ण कुटुंब शिकते असे म्हणतात.अर्थात या सर्व यशामागे प्रगती मागे या दोन महान समाजसुधारकांचे कष्ट आहेत.हेही विसरून चालणार नाही.

-       मिलिंद धुमाळे
- पूर्वप्रकाशित दैनिक सकाळ २०१६ 


सोमवार, ४ एप्रिल, २०१६

माझ्या भीमराया वाणी सांगा पुढारी होईल का...?

“सोनियाची उगवली सकाळ..जन्मास आले भीम बाळ..” जयंतीची चाहूल लागली कि हे गाणं कानावर ऐकू येतं.जयंतीदिनी आंबेडकरी वाड्यावस्त्यांवर हमखास ऐकू येणारं हे गीत,शहरी मेट्रोसिटी निमशहरी अन ग्रामीण भागातही तेवढेच आत्मीयतेने ऐकलं जातं.ग्रामीण भागात जसे जातनिहाय वेगळे वाडे आहेत तसे शहरातही घेट्टोवस्त्या आहेत.

हा आपला पुढारलेल्या शहरी लोकांचा क्युटनेस.सुदैवाने तो ग्लोबलायझेशनच्या रेट्यात एसआरएच्या साथीने काहीसा विरघळत चालला आहे.

१४ एप्रिल १८९१ हा दिवस आंबेडकरी किंबहुना समस्त भारतीय समाजासाठी सोन्याचा दिवस घेऊन आला,जात-धर्माच्या विषमतेत बरबटलेल्या अमानवीय जोखडात अडकलेल्या भारताला आधुनिकता उदारमतवादी धर्मनिरपेक्ष अशा लोकशाहीचं सुंदर स्वप्न पडलं.त्या स्वप्नाला बाबासाहेबांच्या रूपाने मूर्त स्वरूप मिळालं.एक युगांतर घडलं,हजारो वर्षाचा इतिहास बदलला.जगाच्या इतिहासात दास्य परंपरेला मूठमाती देत मानवमुक्तीचा हा लढा रक्ताचा एक थेंबही न सांडता यशस्वी झाला.

”उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे...झाले गुलाम मोकळे भीमा तुझ्या जन्मामुळे...”
कवी गीतकार वामनदादा कर्डक यांनी या क्रांतीपर्वाचे यथार्थ वर्णन शब्दातीत केलं.पूर्वी ग्रामीण भागात एक म्हण होती.‘बामना घरी लिवणं,कुणब्या घरी दाणं,महारा घरी गाणं,अन कोल्हाट्या घरी नाचणं” बाबासाहेबांना मानवमुक्तीच्या या लढ्यात समर्थपणे प्रामुख्याने साथ दिली ती यातील महार समाजाने..

या समाजाने लोककलेच्या माध्यामातून अनेक शाहीर महाराष्ट्राला दिले आहेत.ज्यांनी इथल्या माणसांवर, माणसांच्या दु:खावर रचना केल्या.बाबासाहेबांनी आरंभलेल्या चळवळीत त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. बाबासाहेबांना या शाहिरांचा उचित आदर होता.ते एके ठिकाणी आपल्या भाषणांत म्हणतात “माझी दहा भाषणे आणि शाहिरांचे एक गाणे “ यावरून बाबासाहेबांचे शाहिरांबद्दलचे प्रेम आणि आदर आपण समजू शकतो.काही अंशी आंबेडकरी चळवळ वाढविण्याचे अन जनमानसांत रुजविण्याचे व ती जगविण्याचे काम या शाहीर जलसाकारांनी केले आहे.

आंबेडकरी अनुयायांना आंबेडकरोत्तर सामाजिक आणि धार्मिक अनुषंगाने चळवळीच्या माध्यमातून समाधानकारक कामगिरी करता आली.काहीअंशी स्वप्रगती साधता आली.परंतु दुर्दैवाने राजकीय चळवळ मात्र यशस्वीपणे राबविता आलेली नाही.राजकीय अपयश हे जुने दुखणे आहे.एकेकाळचा भक्कम विरोधी पक्ष म्हणून ज्याचे संसदेत संख्याबळ हे कॉंग्रेसच्या खालोखाल होते,तो आंबेडकरी चळवळीचा “शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन” हा पक्ष होता.हे वाचले तरी आज विश्वास बसणार नाही.अशी आजची परिस्थिती आहे.परंतु हि वस्तुस्थिती आहे.

सोशल इंजिनिअरिंगचा हा प्रयोग बाबासाहेबांनी तेव्हाच केला होता.प्रस्थापितांच्या राजकारणाला शह देणारा मानवी उत्कर्षाचा समग्र राजकीय विचार हा केवळ आंबेडकरी चळवळीत आहे.हे माहित असल्यामुळे प्रस्थापितांनी हि राजकीय चळवळ फोडण्याचा अन खिळखिळी करण्याचा अतोनात प्रयत्न केला.नेत्यांना विविध आमिषे दाखवून आपल्या वळचणीला जोहार म्हणत उभे राहण्यास भाग पाडले. नेतेही कलंदर.अमुकतमुक मंत्रीपद द्या तरच युती करतो असे बेधडक मागणी करणारे.

जनतेचे प्रश्न सोडवा.शिक्षित पदवीधर तरुणांना नोकऱ्या लावा.बॅकलॉग भरा.नविन प्रभावी योजना राबवा एकूण काय तर ‘गरीब वंचित जनतेचे मुलभूत प्रश्न सोडवा तरच युती करतो’ अशी मागणी करणारा नेता अजून जन्माला यायचा आहे.त्यामुळे राजकीय नेत्यांबाबत आंबेडकरी जनतेत उदासीनता आहे.ती नेत्यांच्या अशा बेगडी कचखाऊ धोरणांमुळे.त्यातल्यात्यात समाधानकारक नेतृत्व आणि वाटचाल एकमेव भारिप पक्ष आणि त्याचे अध्यक्ष बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांचे.परंतु ते व्यापक प्रमाणावर स्विकारले जात नाही.यामागेही रिपब्लिकन राजकारण आहे.जसे प्रस्थापित राजकारण करतात तसे अंतर्गत विस्थापित राजकारण करतात.या सर्वांना कंटाळलेल्या जनतेने अनेकदा ऐक्य घडवून आणण्याचा प्रयत्न केला.बुद्ध बाबासाहेबांच्या शपथा दिल्या.आत्मदहनाचे प्रयत्न देखील झाले.  

१९९०,१९९४,१९९८,२०११ या चार वेळी ऐक्य प्रत्यक्षात घडून आलं. पैकी १९९८ मध्ये लोकसभा निवडणुकीत अॅड.प्रकाश आंबेडकर,प्रा.जोगेंद्र कवाडे,रा.सु.गवई विदर्भातून आणि रामदास आठवले मुंबईतून निवडून आले.निवडून आल्यानंतर ऐक्याचे कवित्व संपलं प्रत्येक नेता आपआपले शक्ती प्रदर्शन करू लागला.बेबनाव झाला आणि पुन्हा नेते वेगळे झाले.ऐक्य फार काळ मानवले नाही.जनतेने ऐक्याचा नाद सोडला.नेत्यांचे हे वैशिष्ट्यगुण असताना रिपब्लिकन पक्षात दररोज एका नव्या पक्षाची भर पडते आहे.त्यास पक्ष म्हणण्यासारखी परिस्थिती नाही.त्यामुळे गटबाजीचे हे राजकारण आज लाजिरवाणे झाले आहे.रिपब्लिकन पक्ष/गटांची आकडेवारी पाहिली तर आजमितीस ती ४० च्या वर आहे.

हे बेसुमार राजकीय गट राजकारणातही सुमार कामगिरी करतात.किंबहुना ते नेमकं काय राजकारण करतात हा मुलभूत प्रश्न आहे.अशी दयनीय राजकीय अवस्था असताना आंबेडकरी जनता मात्र आपला नेता बाबासाहेबांनाच मानत आली आहे.त्यांची निस्सीम निष्ठा व बांधिलकी बाबासाहेबांच्या वैचारिक चळवळीशी आहे.ती नुसतीच अंधभक्ती अन भाबडी नसून डोळस आहे.कोणतीही चळवळ उभी राहण्यासाठी तिला ठोस भूमिका आणि वैचारिक बैठक असावी लागते.चळवळ एकाकी उभी रहात नाही,ती कुणाच्या तरी खांद्यावर उभी असते.खांदे बळकट असतील तरच चळवळ तगते,फुलते त्यावर उभे राहूनच भविष्याची वाटचाल होते.खांदे पोकळ लेचेपेचे अन कच खाणारे असतील तर त्यावर उभी राहणारी चळवळसुद्धा डळमळते,कोसळते,बाबासाहेब हे तथागत भगवान बुद्ध आणि क्रांतीबा जोतीराव फुले यांच्या मजबूत वैचारिक खांद्यावर उभे होते.या दोघांच्या भक्कम खांद्यांवर उभ्या केलेल्या चळवळीने नवा इतिहास लिहिला.त्या इतिहासाचे नायक अन म्हणून युगपुरुष ठरले ते अर्थात डॉक्टर बाबासाहेब तथा भीमराव आंबेडकर.

आंबेडकरोत्तर चळवळ हि बाबासाहेबांच्या पोलादी खांद्यावर आजही न डगमगता उभी आहे.मानवमुक्तीची हि चळवळ आंबेडकरी विचार वारसा जोपासत तो समाजात रुजवते आहे.सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यात ती आग्रही आणि अग्रभागी आहे.आंबेडकरवाद हा समता स्वातंत्र्य बंधूता न्याय हि वैश्विक मुल्ये जपणारा आणि विवेकवादी वैशिष्ट्य असणारा वाद आहे,सामाजिक राजकीय आणि धार्मिक तिन्ही क्षेत्रात डॉक्टर बाबासाहेबांनी भरीव योगदान देवून समाजाला एक भक्कम इन्स्टीट्युट पर्याय म्हणून दिले आहे.त्याअर्थाने आंबेडकर हे एक परिपूर्ण स्कूल आहे.या वैचारिक स्कूलमध्ये शिकणारी व्यक्ती हि आयुष्यभर वरील वैश्विक मुल्ये जपत विवेकवाद जोपासते.गेली साठ वर्षे नियमित चैत्यभूमीला लाखो अनुयायी कोणतेही गालबोट लागू न देता अतिशय शिस्तबद्धरीतीने अभिवादन करत असतात जगाच्या पाठीवर घडणारी हि दुर्मिळ घटना आहे.
तो काही चमत्कार नाही.हा संयम अन शिस्त येते आंबेडकरी विचारातून.

आंबेडकरी समाज अन्याय अत्याचारांच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी तेवढाच संवेदनशील असलेला दिसतो.दुर्दैवाने इतर दलित समाजाला असे अन्याय अत्याचाराविरुद्ध बंड करण्याचे भान अजूनही आलेलं नाही असं म्हणावं लागेल.आंबेडकरीबौद्ध सोडले तर आजही अशावेळी यल्गार पुकारणारे तुलनेत फार कमी आहेत.
आज कोणत्याही आंदोलनासाठी आंबेडकरी जनता राजकीय नेत्यांची वाट पहात नाही.
आंबेडकरी समाज गटात गटात विभागलेला असला तरी अशावेळी मात्र सर्व विसरून तो एक होतो.
“डेड आंबेडकर इज मोर डेंजरस देन अलाइव” याची प्रचीती अनेकदा देशाने घेतली आहे.

११ जुलै १९९७ रोजी घडलेलं घाटकोपर पूर्व येथील रमाबाई आंबेडकरनगर हत्याकांड,त्यात बळी गेलेल्या दहा निष्पाप नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी आंबेडकरी समाजाने महाराष्ट्रात ठिकठिकाणी उग्र निदर्शने  करत दहा वर्षे झुंज देत अनुक्रमे सत्तेवर असणाऱ्या शिवसेना-भाजप,राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस यांना गोळीबाराचे आदेश देणाऱ्या जातीयवादी मनोहर कदमवर गुन्हा नोंदविण्यास अखेर भाग पाडले.गुंडेवार आयोगाने मनोहर कदमला दोषी ठरवले,त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली.

शिवसेनेने मनोहर कदमला स्वखर्चाने वकील दिला.पुढे सर्वोच्च न्यायालयाने त्यास जामीन दिला.शेवटी न्याय झालाच नाही.आंबेडकरीचळवळ समाजाला या प्रस्थापित पक्षांनी आणि व्यवस्था चालविणारांनी नेहमीच अन्यायी अन अपमानकारक वागणूक दिली.आंबेडकरी समाज हे ओरखडे काळजावर झेलत संघर्ष करतो आहे.अन्याय अत्याचाराविरोधात त्याला मनस्वी चीड आहे.अन्याय मग तो समाजातील कोणत्याही घटकांवर झालेला असो त्यासाठी प्रथम रस्त्यावर उतरतो तो आंबडेकरी समाज.

२९ सप्टेंबर २००६ रोजी भंडारा जिल्ह्यातील खैरलांजीत घडलेलं हत्याकांड हे पुरोगामी अन संतांची परंपरा सांगणाऱ्या महाराष्ट्रावर कधीही न पुसला जाणारा एक ठाशीव काळाडाग आहे.जनतेने कोणत्याही नेतृत्वाविना महाराष्ट्रासह देशभरात उस्फुर्त आंदोलने केली.आक्रमक आंदोनामुळे तत्कालीन सरकारला यात लक्ष घालावे लागले.सदर खटल्यात आंबेडकरी कार्यकर्त्यांनी अॅड.वाहावणे यांची नियुक्ती करावी अशी मागणी केली होती.तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुखांनी ती मान्य करून नियुक्तीचे पत्रही दिले परंतु ऐनवेळी सरकारी वकील अॅड.उज्वल निकम यांची नियुक्ती केली गेली.सदर खटल्यात अॅड.उज्वल निकम यांनी सामुहिक बलात्कारासाठी असणारे ३७६ ई हे कलम न लावता साधे विनयभंगाचे कलम लावले.त्यामुळे खटला कमकुवत झाला.मुंबईतील शक्तीमील बलात्कार प्रकरणी त्या तीन आरोपींना मात्र हे कलम लावण्याची मागणी अॅड.उज्वल निकम यांनी केली आणि त्यानुसार त्यांना फाशीची शिक्षा देखील झाली आहे.त्यामुळे अनेक पातळ्यांवर संघर्ष करावा लागतो आहे.

१ जानेवारी २०१३ रोजी आंतरजातीय प्रेमप्रकरणातून सोनई हत्याकांड घडले.तथाकथित उच्च (मराठा) आणि कनिष्ठ जात हा अडसर ठरला त्यातून एकाच घरातील तीन तरुणांच्या देहांचे अक्षरशः तुकडे केले गेले.दुर्दैवी तरुण होते हिंदू-मेहतर (वाल्मिकी),हिंदू धर्मव्यवस्थेच्या जात उतरंडीत पूर्वास्पृश्य अन आता लौकिक अर्थाने “दलित”.जातीयवादाचे बळी ठरलेल्या या तीन तरुणांचा एक भाऊ पंकज धनवार हा भारतीय सैन्यात सीमेवर कर्त्यव्य बजावतो आहे.आपल्याकडे सैन्यातील जवानांचा उपयोग अलीकडे भावनिक राजकारणासाठी केला जातो म्हणून हि जास्तीची माहिती.

२८ एप्रिल २०१४ रोजी नितीन आगे प्रकरण घडले.त्यापाठोपाठ २४ ऑक्टोबर २०१४ रोजी जवखेडा घडले या दोन्ही घटनांमुळे महाराष्ट्र हादरला सोशल मीडियामध्ये तीव्र पडसाद उमटले.यात नितीन आगे हा हिंदू-मातंग.हिंदू एकता,समरसता अशा गप्पा मारणारे,मुस्लिम समाजाची भीती दाखवत सर्व हिंदुना त्याविरुद्ध उभे राहण्यासाठी भडकवणारे तथाकथित हिंदू उच्चजातीय आपल्याच हिंदू दलित बांधवांच्या देहाचे सुपारी कातरावी तसे तुकडे करून फेकून देतात,अशावेळी कुणी हे थांबवा म्हणून चिंतन मनन प्रबोधनात्मक शिबीर घेताना दिसत नाही.काळीज हलते ते फक्त आंबेडकरी समाजाचे,अस्वस्थ होतो तो फक्त आंबेडकरी तरूण.यातून आपल्याकडे एक विचित्र समज निर्माण झाला.”दलित” म्हणले कि डोळ्यासमोर येतो तो आंबेडकरीबौद्ध समाज.प्रसारमाध्यमांनाही “दलित”शब्द कोण प्रिय.बातमीचे वृत्तांकन करताना दलित शव्द वापरला कि काम झाले.त्यामुळे इतर तथाकथित उच्चजातींना तसा समज आहेच परंतु वंचित मागास जातींचाही असाच गैरसमज आहे.दलित हत्याकांड झाले तरी बौद्धेतर जाती त्याविरुद्ध उतरताना दिसत नाहीत.भले ती घटना आपल्याच जात बांधवासोबत घडलेली का असेना.

नितीन आगे प्रकरणात मातंग समाजातील एकही संघटना न्यायासाठी रस्त्यावर उतरलेली नव्हती.अलीकडे काही मातंग संघटना पिवळासलाम म्हणतात.पिवळा झेंडा घेऊन एससी प्रवर्गातून वेगळे आरक्षण हवेय अशी मागणी करतात.स्वभान आलं पण कसं? जातीय अस्मिता किती टोकदार झालीय याचे हे उदाहरण.कोणत्याही अशात दलित हत्याकांडाच्यावेळी पोलिसांची भूमिका हि नेहमीच संशयास्पद राहिली आहे.पोलीस प्राथमिक रिपोर्टच असा बनवतात कि केसच उभी राहणे मुश्किल होते.याचा अनेकदा प्रत्यय आला आहे.सोनईच्या घटनेत सुरुवातीला पोलिसांनी आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्याचा प्रताप केला.त्यांनतर व्ही ए दौलताबादकर यांच्या न्यायालयात खटल्याच्या सुनावणी दरम्यान सकाळी ११ ची वेळ असताना आरोपींना चक्क दुपारी 3 वाजता हजर करण्यात आले.अर्थात सुनावणी होऊ शकली नाही.न्यायालयाने पोलिसांची कानउघाडणी केली. पोलिसांना ना न्यायालयाची भीड ना कसली तमा.अशा धर्तीवर अॅट्रॉसिटी अॅक्टचा गैरवापर होतो अशी नेहमी खोडसाळपणे आवई उठवून तो रद्द करा अशी मागणी केली जाते.खैरलांजीसारख्या प्रकरणात अॅट्रॉसिटी लावला जात नाही,हि वस्तुस्थिती आहे.त्यामुळे हे कार्यतत्पर पोलीस खोट्या अॅट्रॉसिटीजच्या केस कशा काय दाखल करून घेत असतील हे फारच रोचक वाटते.मुळात जातदांडगे धनदांडगे लोक या कायद्याला घाबरून आहेत.आणि त्यांच्या सरंजामीवृत्तीवर या कायद्यामुळे बर्यापैकी अंकुश बसला आहे.हे वास्तव आहे.म्हणून त्याचा वेळोवेळी विरोध केला जातो.अशावेळी एक दबाव गट हवा.खंबीर नेतृत्व हवं, तो दबाव गट सोशल मिडीयाच्या माध्यमातून आंबेडकरी तरुणांनी बऱ्यापैकी परिणामकारक असा बनवला आहे.केवळ सोशल मिडियात न राहता तो ग्रासरूट लेव्हलवर काम करतो आहे.समाज सध्या नेतृत्वहिन असला तरी आंबेडकरी चळवळ आज परिणामकारकरित्या आपली भूमिका निभावते आहे.
सोशल मिडिया प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मिडीयातही हि परिणामकारकता आता दिसून येते आहे.

सोशल मिडिया नव्हती तेव्हा दलित अत्याचाराच्या बातम्या या फार उशिराने वर्तमानपत्रातून समजत होत्या.अलीकडे सोशलमिडियामुळे बातम्या ताबडतोब जनमानसात पोहोचतात.सदर घटनांवर सामान्यांना प्रतिक्रिया व्यक्त करायला पूर्वी माध्यमही नव्हतं ती कमी सोशल मिडीयाने भरून काढली.अशा बातम्या आल्या कि आंबेडकरी तरुण अस्वस्थ होतो. पूर्वी शिक्षण नोकरी यात वेळातवेळ काढून स्थानिक पातळीवरील विभागीय कार्यक्रम आणि अवांतर वाचन होत असे.यातही एखादा उत्साही असेल तरचं तो भाग घेई.वैयक्तिक पातळीवर होणाऱ्या चर्चाही सीमितच त्यामुळे प्रत्यक्ष चळवळीत काम करणाऱ्या सुशिक्षित तरुणांची संख्या रोडावली होती.हे चित्र सोशल मिडीयाने बदललं.नोकरी शिक्षणात व्यस्त असलेला सुशिक्षित आंबेडकरी तरुण पुन्हा चळवळीकडे ओढला गेला.किंबहुना आता त्याला एक व्यापक आणि परिणामकारक स्वरूप आलं आहे.
आपल्या जबाबदारीचे भान आलं आहे.

कोणत्याही दलित मागास वंचित घटकावर झालेला अन्याय अत्याचार हा आंबेडकरी समाजाला आपल्यावरील अन्याय वाटतो.कारण सारा मागास शोषित वंचित समूह हा एकच आहे.हा आंबेडकरी चळवळीची मूळ वैचारिक सिद्धांत राहिला आहे. उत्तर प्रदेश दादरीमध्ये गोमांसची अफवा उठवून खून करण्यात आलेलं अखलक प्रकरण असो मद्रास आयआयटी आंबेडकर पेरियार स्टडी सर्कल असो कि दिल्ली जेएनयु कन्हैया कुमार या सर्वांसाठी आंबेडकरी चळवळ खंबीरपणे उभी राहिली. हैद्राबाद रोहित वेमुला हत्या प्रकरणात आंबेडकरी विद्यार्थ्यी संघटना आणि डाव्या संघटना यांनी देशात अक्षरशः रान उठवले. त्याचा परिणाम एवढा तीव्र होता कि आरएसएसने त्यामुळे बिथरून काही मोर्चांवर थेट हल्ले केले.त्यांची विद्यार्थ्यी विंग abvp ने हल्ले केले. मिडीयाला हाताशी धरून देशद्रोहाच्या कहान्या रचण्यात आल्या.शिवाय पोलिसी बळाचा वापर करून आंदोलने चिरडण्याचा प्रयत्नही झाला.तरीही आंबेडकरी तरुणांनी देशभरात ठीकठिकाणी निदर्शने केली.निषेध केले.सोशल मिडिया इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मिडिया सगळीकडे आपली परखड भूमिका मांडत अन्यायाविरुद्ध बंड करून प्रत्यक्ष रस्त्यावर उतरली आंबेडकरी चळवळ.सरकारला याची दखल घ्यावी  लागली केंद्रीय मंत्र्यांना संसदेत जबाब द्यावा लागला.

रोहितला अजून न्याय मिळालेला नाही त्यासाठी अजूनही संघर्ष चालूच आहे.सध्या आंबेडकरी चळवळीला कोणतेही ठोस नेतृत्व नसताना विवेकावादाची कास  धरत अन्यायाविरुद्ध संवैधानिक मार्गाने दाद मागत संघर्ष करण्याचे बळ आणि भान आलेय ते केवळ आंबेडकर नावाच्या धगधगत्या ज्वालामुखीमुळे.आता इथून पुढील संघर्ष हा शिक्षण आरक्षण आणि संविधान यांच्यासाठी करावा लागणार आहे. देशात आजही कुठे न कुठे बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना होते सोशल मिडीयात अपमानजनक मजकूर येतो.अनेक लोक त्यांच्या जातीवरून आपली संस्कृती दाखवून देतात.यावर एक सांगावेसे वाटतं.युरोप खंडात हंगेरी नावाचे एक शहर आहे. तिथे रोमा नावाची एक भटकी जमात आहे, ज्यांना जिप्सी म्हणूनही ओळखल्या जाते.तिथे ते नागरी हक्कांपासून वंचित होते. त्यांच्या डेर्डेक तिबोर या नेत्याला इंटरनेटद्वारे बाबासाहेब त्यांचे कार्य कर्तृत्व अन विचार समजले.डॉक्टर आंबेडकरांना प्रेरणास्थान मानून त्यांनी संघटना बांधली तिथे संघर्ष केला.सरकारशी झगडून त्यांनी आपले हक्क मिळवले.

मुला-मुलींसाठी डॉक्टर आंबेडकर स्कूल याच नावाने तीन शाळा काढल्या. डेर्डेक तिबोर इतक्यावर थांबले नाहीत त्यांनी स्वत: बुद्धिस्ट धम्म स्वीकारला आणि त्यांच्या समुदायालाही त्याची दीक्षा दिली.जगात जिथे कुठे वंचित अन्यायग्रस्त नाडलेला समाज असेल त्यांना बाबासाहेब त्यांचे विचार हे कायम प्रेरणादायी ठरणार आहेत.त्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब हे खऱ्या अर्थाने विश्वरत्न विश्ववंदनीय ठरतात.

यंदाचे हे १२५ वे जन्मशताब्दी वर्षे त्यानिमित्त जगातील तमाम शोषित वंचित समूहांना आणि देशवासियांना आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि विनम्र अभिवादन

शेवटी जाताजाता या ओळी उधृत केल्याशिवाय रहावत नाही.
सुज्ञानाचा निर्मळ झरा भीमासारखा माणूस खरा जन्मा येईल का....? 
माझ्या भीमराया वाणी सांगा पुढारी होईल का...?
जयभीम !!


- मिलिंद धुमाळे 
- पूर्वप्रकाशित दैनिक दिव्यमराठी जयंती विशेषांक २०१६ 

शुक्रवार, ४ मार्च, २०१६

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे दुर्लक्षित पैलू

परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय या मुल्यसूत्रांवर आधारित एक व्यक्ती एक मूल्य वोट असणाऱ्या लोकशाहीचा दस्तावेज म्हणजे आपली राज्यघटना लिहून देशावर अनंत उपकार केले आहेत.म्हणूनच त्यांना भारतरत्न या उपाधीने देशाने गौरवान्वित केले आहे.
ते केवळ भारतीय घटनेचे शिल्पकारच नसून आधुनिक भारताच्या शिल्पकारांपैकी एक आहेत.
यंदाचे वर्षे हे  त्यांचे १२५ वे जन्मशताब्दी वर्षे म्हणून देशवासीय साजरे करत आहे. कमानी ट्युब्जच्या  कल्पना सरोज यांच्या प्रयत्नाने संयुक्त राष्ट्रसंघातही घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती साजरी होणारअसून विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.सदर कार्यक्रमासाठी १६५ देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.त्यानिमित्ताने या लेखमालेतील हे पहिले पुष्प.बाबासाहेब केवळ अस्पृश्योद्धारक शोषित वंचित समाजाचे मार्गदाते कायदेपंडीत घटनाकार नव्हते तर त्यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक विषयांवर अभ्यास केला आणि असाध्य ते साध्य करत त्यावर प्रभुत्व मिळविले.त्या अर्थाने त्यांचे व्यक्तिमत्व चतुरस्त्र होते.मानवी कल्याणाच्या उपयोगाकरिता असलेल्या प्रत्येक गोष्टीचे महत्व जाणून त्यांनी त्याची पराकाष्ठा केली.त्यांच्या अशाच वाचनात न आलेल्या काही महत्वाच्या आणि वेगळ्या पैलूंवर आपण प्रकाश टाकणार आहोत.
कलाप्रेमी बाबासाहेब-
एकीकडे देशासाठी समाजासाठी चंदनाप्रमाणे झिजत असताना बाबासाहेब वैयक्तिक छंद सुद्धा जपत असत वाचन मनन आणि कलेची आवड यातून बाबासाहेबांनी वयाच्या ६० व्या वर्षी व्हायोलीन शिकण्याचा निर्णय घेतला. सिद्धार्थ विद्यालयातील ग्रंथालय अधिकारी रेगे यांनी बळवंत साठे यांना बाबासाहेबांना व्हायोलीन शिकवण्यासाठी पाठवले. रेगे आणि त्यांचे मोठे बंधू दोघेही बाबासाहेबांना व्हायोलीन शिकवायचे. बाबासाहेबांसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वाला शिकवणे कसे जमणार म्हणून अनिच्छेने आम्ही शिकवण्यास गेलो पण बाबासाहेबांच्या मनमिळाऊ आणि खेळकर स्वभावामुळे आमचे दडपण दूर झाले असे साठे अभिमानाने सांगतात. साठे बाबासाहेबांना त्यांच्या वेळेनुसार राजगृह वर व्हायोलीन शिकवत असेबाबासाहेबांनी २ वर्ष हे तंतू वाद्य शिकून घेतले आणी आपल्या फावल्या वेळेत ते हे वाजवायचे. खूप दुखः भोगलेली माणसे व्हायोलीन उत्तम वाजवतात असे मी कुठेतरी वाचलेले आठवतंय. व्हायोलीनमधून निघणारा स्वर एक वेगळ्या प्रकारचे तरंग मनात निर्माण करतो. १९५१ ते १९५३ या कालावधीत साठे यांना बाबासाहेबांना व्हायोलीन शिकवण्याचा सन्मान मिळाला पहिल्या दिवशी त्यांनी बाबासाहेबांना सांगितले कि व्हायोलीन हे तंतू वाद्य प्रकारातला सर्वात कठीण प्रकार आहे,
बाबासाहेबांनी लागलीच व्हायोलीन बद्दलची सर्व साहित्य मागवली आणि रीतसर अभ्यास सुरु केला, "व्हायोलीन : हाऊ टू मास्टर इट" हे पुस्तक स्वतःसाठे यांनी बाबासाहेबांना दिले होते संगीताबद्दलचे त्यांचे प्रेम आणि शिकण्याची प्रबळ इच्छा मी पहिल्यांदा कुणामध्ये पाहत होतो असे साठे सांगत असे पण त्यांचे शरीर त्यांच्या मेहनतीला साथ देत नव्हतेव्हायलीनचा बो खूप वेळ ते धरू शकत न्हवतेत्यांचा हात दुखून येई मग ते थोडी विश्रांती घेत आणि पुन्हा सराव करत,थोड्याच कालावधीत बाबासाहेब फार उत्तम व्हायोलीन वाजूउ लागले असे साठे यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. बाबासाहेब काही काळाने दिल्लीत स्थलांतरित झाले तेव्हा तिथे सुद्धा त्यांनी मुखर्जी नावाच्या व्हायोलीन शिक्षकाला रुजू केले होते अशी माहिती आहे.
बाबासाहेबांच्या घरात कामात मदत व्हावी म्हणून एक १२ वर्षाची मुलगी येत असे तिचे नाव वनस्पती दुर्गतती बाबासाहेबांची आठवण सांगताना म्हणते कि, "बाबासाहेब व्हायोलीन चा सराव करायला लागले कि मी रमाई च्या खोलीत त्या सुरावर नाचत असेरमाईला फार गम्मत वाटे त्यांनी कधीच माझी तक्रार करत नसे उलट प्रेमाने मला जवळ घेत,बाबासाहेबांशी जास्त बोलणे होत नसे पण कशी आहेसजेवलीस का ? अशी विचारपूस करायचे,बाहेर निघताना माझ्या गालावर डोक्यावर प्रेमाने थोपटत आणि सांगत आई ला त्रास देऊ नकोस
बाबासाहेबांनी एकदा कुठल्या गोष्टीचा ध्यास घेतला कि ते पूर्ण केल्याशिवाय सोडीत नसे. बाबासाहेब जितके कठोरशिस्तप्रिय होते तितकेच ते रसिक आणि मृदू स्वभावाचे होते हे यातून दिसून येते.बाबासाहेबांचा हात व्हायोलीन वाजवताना दुखू लागला काही काळाने त्यांनी व्हायोलीन वाजवायचे थांबवले परंतु त्यांना आता चित्रकलेत आवड निर्माण झाली. बाबासाहेबांनी चित्र काढण्यासशिकण्यास सुरवात केली. बाबासाहेब फार सुंदर चित्र काढत आणि घरातील नोकरांची पहिली दाद मिळत, "साहेबचित्रात जणू जाणच ओतलीत" असे ते म्हणत बाबासाहेबांना आनंद होत असे ते गालातल्या गालात हसतबाबासाहेबांनी रेखाटलेले डोळे उघडे असलेली गौतम बुद्धांचे चित्र अजूनही औरंगाबादला ठेवली आहे.
सुंदर चित्र आणि स्थापत्य कलेचा उत्तम नमुना बाबासाहेबांना आकर्षित करत असेशिल्प कलासुंदर इमारतीचे बांधकाम याबद्दल बाबासाहेब आपल्या गप्पांमध्ये चर्चा करत असे. एखाद्या कलेचे कौतुक सुद्धा भारतात जातीय दृष्टीकोनातून पहिले जाते,आणि अशा प्रवृत्तीमुळे कला दाबली जाते आहेसंपुष्टात येत आहे अशी ते तक्रार करतमाणसाने अशा जातीत जन्म घ्यावा जिथे कुठल्या न कुठल्या कलेचा वारसा आहे.
बाबासाहेबांचे घर म्हणजे काही वाडा वगैरे न्हवता पण एखाद्या राजा प्रमाणे थाट मात्र होताबाबासाहेबांच्या राजगृहात भले मोठे ग्रंथालयकित्येक उंची बुटांचे जोडनिरनिराळेविविध प्रकारचे फाउंटन पेन बाळगणे बाबासाहेबांची विशेष आवड , तसेच उंची कोट आणि टोपी ते बाळगतदुर्मिळ चित्रांचे संकलन त्यांच्या विजयी व्यक्तिमत्व आणि आयुष्यातील अडथळ्यांची उडवलेली दाणादाण याचे पुरावे होते. असे वाटायचे कि उंची राहण्यातदर्शवण्यात त्यांचा एक सुप्त आनंद होता. बाबासाहेबांनी सिगारेट दारू पासून कायम दूर राहिले इतर सर्व प्रकारच्या लोकांच्या सानिद्ध्यात राहून सुद्धा त्यांनी स्वतःला निर्व्यसनी ठेवले होते.
बाबासाहेबांचे पुस्तकप्रेम त्यांना समाजातील इतर करमणुकीच्या गोष्टींपासून दूर ठेवत होते. नाही म्हणायला त्यांनी काही सिनेमे पाहिले होते. रमाई सोबत त्यांनी "Uncle Tom" हा सिनेमा पहिला होता. " अछुत कन्या" हा हिंदी सिनेमा पाहताना त्यांचे डोळे पाणावले होते. त्यांच्या दुसर्या पत्नी डॉ.शारदा कबीर यांच्या सोबत त्यांनी "Oliver Twist " हा सिनेमा पहिला होता.
बाबासाहेबांना क्रिकेट खेळ खूप आवडायचाते तरुण वयात खुपदा खेळायचेपहिल्या पत्नी सोबत त्यांच्या माहेरी धारवाडला आल्यानंतर ते तेथील वसतिगृहातील मागासवर्गीय विद्यार्थांसाठी क्रिकेटचे सामने भरवत असत आणि स्वतः सुद्धा भाग घेत असत. विशीत असताना बाबासाहेब पत्ते (cards, raund the bridge ) सारखे खेळ खेळतमित्रांसोबत व्यायाम म्हणून किंवा बदल म्हणून बाबासाहेब समुद्रात पोहण्यास सुद्धा जात असत
प्राणीप्रेमी बाबासाहेब-
बाबासाहेबांच्या हस्ताक्षाराला एक वेगळी शैली आणि अंदाज होताफार सुंदर पद्धतीने ने पेन चालवायचेखूप लोक त्यांच्या अक्षराची प्रशंसा करायचेबाबासाहेबांना कुत्रांची फार आवड होतीएखाद्या वेगळ्या वंशाचा कुत्रा त्यांना हवा असल्यास ते देशाच्या कानाकोपरयात चौकशी करत. त्यांनी पळालेल्या "टोबी" कुत्रा आणि एक हरणाचे पाडस वर त्यांचे विशेष प्रेम होतेखूप लळा लागला होता त्यांना त्यांचादामोदर हॉल वर वस्तीला असताना बागेत ते तासंतास या दोघांसोबत खेळत असतत्यांना भरवत असत.एकदा त्यांचा लाडका कुत्रा टोबी जेवण करत न्हवताबाबासाहेबांनी खूप प्रयत्न केला पण तो जेवला नाहीबाबासाहेब त्याला विचारायचे "अरे कशासाठी हा सत्याग्रह आणि उपोषण ?" बाबासाहेबांना खूप वाईट वाटायचे ते सुद्धा त्या दिवशी जेवत नसत.
माणुसकी जपणारे बाबासाहेब-
एकदा प्रवासात आपल्या सोबत असलेल्या सहकारी कार्यकर्त्याकडे पांघरून न्हवते तेव्हा बाबासाहेबांनी त्यांच्याकडील असलेले चादर त्याला दिली आणि झोपायला सांगितलेसकाळी जेव्हा जाग आली तेव्हा बाबासाहेबांच्या अंगावर काहीच न्हवते फक्त वळकटी अंथरून ते झोपले होतेत्याने विचारले असे का केले तेव्हा बाबासाहेब म्हणाले "माझ्याकडे एकाच होती ती मी तुला दिली" तो अनुयायी काहीच बोलला नाही पण डोळ्यात अश्रू मात्र चमकले. एकदा कुणीतरी जवळचा सहकारी साहेबाना भेटायला आलात्यावेळी नेमके घरात कुणी न्हवतेबाबासाहेब स्वतः स्वयंपाक घरात गेले आणि चहा बनवायला घेतलं पण त्यांना दुधाचे भांडे काही सापडेनात्यांनी मित्राला विचारले "काळा चहा घेतोस न रे बाबा ?" मित्र म्हणाला "बहुतेक वेळा मी बिन दुधाचा चहा घेतो" बाबासाहेब मिशिकीलपणे म्हणाले,"पण आपल्या आयुष्यात दुधाचा साठा एकदा तरी मिळालाच पाहिजे" असे बोलून बाबासाहेबांनी पावाचे दोन तुकडे केले (double roti), मित्र एवढा पाव नको म्हणताच बाबासाहेब हसून म्हणाले "अरे समान हक्कांसाठी तर आपली लढाई आहे" आणि दोघ गप्पांमध्ये रंगून गेले
एकदा संध्याकाळी बाबासाहेब घरी परतत असताना त्यांना थंडीने कुडकुडत बसलेला एक वृद्ध गृहस्त दिसलाबाबासाहेबांना त्याची दया आलीबाबासाहेब त्याच्याजवळ गेले आपला उंची कोट काढून त्याच्या अंगावर टाकलात्याला मिठी मारली आणि म्हणाले "तुमच्यासारखे या समाजात कित्येक लोक आहेतआपल्याला जमेल तेवढे प्रत्येकाने करायला पाहिजे" असे बोलून बाबासाहेब निघून गेले.बाबासाहेबांची करुणा आणि दुसऱ्याचे दुखः आपले मानण्याचा स्वभाव त्यांना बोधीसत्व पदापर्यंत घेऊन जातात.
बाबासाहेब संसारात लक्ष देत नाहीत कधी विचारपूस करत नाहीतफक्त कामकाम आणि समाज एवढच करत असतात म्हणून रमाई आंबेडकर या काहीशा नाराज असत आणि त्यावरून उभयतांत थोडी फार भांडणे होत असत. एकदा असेच रमाई बाबासाहेबांना म्हणाल्या "कधी तरी घरात लक्ष द्याकाय आहे काय नाहीभाजी पाला,धान्य आहे कि नाही हे पहाव" ते ऐकून बाबासाहेब तडक बाहेर गेले आणि ६ - ७ भाजीच्या जुड्या आणि १०० - १२५ बोंबीलच्या काड्या घेऊन आलेते पाहून त्यांच्या आत्या हसत म्हणाल्या, "भीमा अरे एवढी भाजी आणलीसखराब होईल तीएक दिवसात संपणार आहे का ?
बाबासाहेबांना मधुमेहा ने हैराण केले होतेत्यांचे शरीर त्यांना तसे संकेत देत असावेत म्हणून मरणापूर्वी बाबासाहेब आपल्या अत्यंत निकटचे सहकारी दादासाहेब गायकवाड यांना एका पत्रात म्हणतात, "भाऊराव मी आत जास्त काळ नाही जगणारतुम्ही मनाची तयारी करून ठेवा". या एका वाक्याने भाऊरावांची काय अवस्था झाली असेल हे भाऊरावच जाणतातशोषित पीडितांचे उत्कर्षासाठीच त्यांना दीर्घ आयुष्य लाभले असावे असे बाबासाहेब गमतीने म्हणत असत आणि हाच विश्वास बाबासाहेबांना त्यांच्या शारीरिक विकार आणि त्रासावर मात करण्यास बळ देत असावेत. मृत्यूच्या आधी काही दिवस एका निवांत संध्याकाळी साहेबांचा सेवक नानाकचंद रत्तू बाबासाहेबांच्या सोबत होताबाबासाहेबांनी नानाकचंद रत्तू ला डोक्यात तेल घालून मसाज करण्यास सांगितलेबाबासाहेबाना थोड बरं वाटलंबाबासाहेब काहीतरी गुणगुणत होतेहळू हळू रत्तू ला आवाज स्पष्ट ऐकू येऊ लागला "बुद्धं सरणं गच्छामि"  " बुद्धं सरणं गच्छामि
बाबासाहेबांनी नानाकचंद रत्तुला त्यांचे आवडते बुद्ध गीत रेकोर्ड वर लावण्यास सांगितले.
असे आपले बाबासाहेबनारळासारखेवरून कठोरशिस्तप्रिय गंभीर वाटणारे आणि आतून गोड पाण्यासारखे आणि मृदूरसिकनिर्मळ आणि मिश्किल स्वभावाचेकामाच्या ओझ्याने आणि समाजाच्या चिंतेने स्वतःच्या तब्येतीची काळजी न घेणारेलाडकी पत्नी आणि मुले यांना सामाजिक कार्यबाहुल्यामुळे  पुरेसा वेळ न देऊ शकणारेहळवेदयाळूमनमिळाऊ आणि जिंदादिल... आपले बाबासाहेब !!

- पूर्वप्रकाशित दैनिक पुण्यनगरी जयंती विशेषांक २०१६ 

Translate