डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचे गुरु क्रांतिसूर्य ज्योतीबा फुले यांनी चालविलेली सामाजिक उत्थानाची परिवर्तनाची चळवळ शेवटच्या टप्प्यात आणून तीस एक आयाम दिला आणि खऱ्या अर्थाने घटनेच्या माध्यमातून ती यशस्वी केली.हिंदू धर्म नाकारून गुरूने सावर्जनिक सत्यशोधक धर्माची तर शिष्योत्तमाने बौद्ध धम्माची स्थापना केली.अलीकडे देशात ब्राह्मण्य ब्राह्मणवाद हिंदुत्व असे शब्द प्रचलित आहेत,सामान्य नागरिकांना हे समजण्यास कठीण होते.तर हे सर्व शब्द आणि त्यांची एका साध्यासोप्या शब्दांत व्याख्या करायची असेल तर “मनुवाद” अशी ती केली पाहिजे.हा शब्द कसा योग्य आहे याची आपण माहिती घेऊ.मनु ऋषीने जो मनुस्मृती नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्यात ब्राह्मण समाजास अवास्तव आणि अवाजवी असे भरमसाठ अधिकार दिले. याद्वारे ब्राह्मण समाजाने आपल्या भोवती एक अभेद्य अशी तटबंदी निर्माण करून घेतली नियम बनवले त्यास धर्माचे नाव दिले.वेद श्रुती पुराणे अरण्यके सगळीकडे ब्राह्मण गौरव आणि श्रेष्ठत्वाचे उल्लेख आहेत.ब्राह्मणोऽस्य मुखमासीद बाहू: राजन्य:कृत:ऊरू तदस्य यदवैश्य पद्धयां शूद्रो अजायत “ हा पुरुषसूक्तातील श्लोक आहे.जो प्रत्येक पूजेत आवर्जून भटजीद्वारे म्हटला जातो.त्याचा अर्थ असा- ब्राह्मण मुखातून क्षत्रिय बाहुंपासून वैश्य मांड्यापासून आणि शुद्र पायांपासून निर्माण झाले. त्यामुळे आजही वेद आणि मनुस्मृतीचे गोडवे गायले जातात.
मुळात देश स्वतंत्र झाल्यापासून आणि इथे लोकशाहीभिमुख राज्यघटना अंमलात आल्यापासून ते व्यवहारात नाहीत त्यामुळे आजवर कुणाचे काहीही अडले नाही.कालविसंगत असूनही काही लोकांना ते पुन्हा पुन्हा इथे रुजविण्याची हुक्की येते,राज्यघटना नाकारून मनुस्मृती लागू करावी असे वाटते.त्यामागे हिच श्रेष्ठत्व मिरविण्याची भावना आहे.बाबासाहेबांनी रिडल्स इन हिंदूइझम आणि शुद्र पूर्वी कोण होते ? हे दोन ग्रंथ लिहिले ज्योतीबांनी शेतकर्यांचा आसूड आणि ब्राह्मणांचे कसब लिहिले,ब्राह्मणांचे कसब हे पुस्तक फुल्यांनी महाराष्ट्र देशातील कुणबी माळी महार मांग या लोकांस अर्पण केले.त्यांनी प्रस्तावनेत केलेला उल्लेख आजही किती चपखल आहे हे वाचून लक्षात येते,”या लहानशा चोपडीस प्रस्तावना लिहिण्याची गरज नाही.आमच्या देशांत ब्राह्मणांचे महत्व किती आहे व ते धर्माच्या मिषाने लोकांवर केवढा जुलूम करतात हे प्रसिद्धच आहे.असे असता कोणी म्हणतील कि हे पुस्तक रचण्याचे कारण काय?तर त्यास असे उत्तर आहे कि,ब्राह्मण आपला कावा सर्व लोकांसी सारखा चालवीत नाहीत.कुणबी माळी वगैरे शुद्र लोकांत त्यांचे भटपण फार चालते.आणि ते इतर जातींच्या आणि विशेषकरून सांप्रतकाळच्या सुधारलेल्या लोकांस फारसे ठाऊक नाहीत.जे विद्या शिकून सुधारले आहेत.त्यांच्यामध्ये भटजीबुवांचे महात्म्य दिवसानुदिवस कमी होत चालले आहे.परंतु अशी गोष्ट शुद्र जातींत नाही.तेथे अद्यापि बाजीरावाच्या वेळची भटशाही राज्य करीत आहे.”
बाबासाहेबांनी या ब्राह्मण्याची व्याख्या केलीय.”जन्मजात उच्चनीच भाव” बाबासाहेब आपल्या बहिष्कृत भारत मधील अग्रलेखात म्हणतात.आंग्लाई आणि ब्राह्मणाई या हिंदी जनतेच्या अंगाला लागलेल्या जळवा आहेत.व त्या एकसारख्या हिंदी जनतेच्या रक्ताचा शोष करीत आहेत.आंग्लाई सत्तेने देहाने लोकांना गुलाम बनविले तर ब्राह्मणाईने लोकांच्या आत्म्याला गुलाम करून ठेविले आहे.ब्राह्मण लोक सर्व प्रकारच्या चळवळीत धडाडीने भाग घेतात.राजकीय चळवळ हे तर त्यांचे जीवनच आहे.एकवेळ जेवण नाही मिळाले तरी चालेल परंतु राजकारणाच्या ताकाचा एखादा भुरकाजर त्यांना मिळाला नाही तर त्यांना अमांशाची पीडा होण्याचा संभव असतो.सामाजिक सुधारणेच्या चळवळीत हि त्यांचे अंग असते.विधवा विवाह बालविवाह केशवपन वगैरे सामाजिक प्रश्नांसंदर्भात त्यांनी आस्था दाखवली आहे.मजूर वर्गाच्या वतीने भांडवलशाहीवाद घालणाऱ्या चळवळीचे ते पुरस्कर्ते होऊ शकतात.नव्हें तर बोल्शेविझम व कम्युनिझमसारख्या आर्थीक हितसंबंधात क्रांती घडवून आणणाऱ्या चळवळी या देशात आणून त्या पाडाला लावण्यास ब्राह्मणच कारणीभूत झालेले आहेत.”
अर्थात तात्पर्य असे कि ब्राह्मणवादी शोषण व्यवस्था निर्माण करणारे जरी ब्राह्मण असले तरी त्यातही काही सुधारणावादी लोक होते.त्यासर्वांना एकत्र घेऊन बाबासाहेबांनी सामाजिक क्रांती केली.आणि यासाठी सर्व धर्मीय आणि सर्व जातीय घटकांना भारतीय राज्यघटनेत समानता बहाल केली.यापुढे देशात होणाऱ्या कोणत्याही चळवळी या सर्व घटकांना सोबत घेऊन सर्वसमावेशक अशी वाटचाल करतील तर यशस्वी होतील.नाहीतर त्यात फुटीरतावादी वृत्ती वाढीस लागून ती क्षीण होईल आणि उन्मळून पडेल.
अलीकडे हा ब्राह्मणवाद त्याच विचाराचे सरकार आल्यापासून अधूनमधून डोके वर काढतो आहे.
बाबासाहेबांनी अनुयायांना नितांत सुंदर असा बुद्धाचा धम्म दिला आहे.
प्रज्ञा शील करुणा हि त्याची वैशिष्ट्ये आहेत.बुद्धाने मध्यम मार्ग सांगितला त्यावर आपण चालले पाहिजे. त्याही पुढे बाबासाहेब म्हणतात मी प्रथम भारतीय आहे आणि अतंत:हि भारतीय आहे.हे आंबेडकरी अनुयायांनी नेहमी लक्षात ठेवले पाहिजे.आपला धम्म आपल्या उंबऱ्याच्या आत असला पाहिजे आपण घराबाहेर पडतो तेव्हा आपण फक्त भारतीय असतो.आपले आचरण नैतिकदृष्ट्या स्वच्छ असले पाहिजे.आपण आंबेडकरांचा आदर्श सांगतो तेव्हा आपले वागणे सुद्धा तसेच असले पाहिजे त्यांच्या विचारांना गालबोट लागणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे.इतर समाज कसे सण साजरे करतात यावर टीका करण्यापेक्षा सामाजिक सौहार्दता वाढविण्यास आपणही मदत केली पाहिजे.आंबेडकरी तत्वज्ञान समता स्वातंत्र्य बंधूता आणि न्याय चार सूत्रावर आधारभूत आहे.त्यासाठी आपण झटले पाहिजे.देशातिल सर्व समाज घटकांना न्याय देण्याची आणि सुखी समृद्ध करण्याची ताकद आंबेडकरी तत्वज्ञानात आहे.त्यामुळे आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत निर्माण करण्यासाठी सर्वांनी प्रामाणिकपणे योगदान दिले पाहिजे.आपले सामाजिक दायित्व पार पाडले पाहिजे.तीच खरी बाबासाहेबांच्या विचारांची जयंती असेल.
- मिलिंद धुमाळे
- पूर्वप्रकाशित दैनिक सकाळ २०१६