सोमवार, २ एप्रिल, २०१८

अॅट्रोसिटी अॅक्ट आणि प्रतिक्रांती

मनुवादी भाजपा सरकारने प्रतिक्रांती करत 20 मार्च ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाच्याच दिवशी अॅट्रोसिटीअॅक्ट कमकुवत करण्याचा अश्लाघ्य प्रयत्न करून देशातील जातीयवादी मानसिकता असणाऱ्या किड्यांना हिंदू-दलित मागासवर्गीय लोकांवर अन्याय अत्याचार करण्यास मोकळे रान उपलब्ध करून दिले.
न्यायालयात मुख्य सॉलीसीटरजनरलना बाजू न मांडण्यासाठी बजावण्यात आलं.त्यामुळे ते गैरहजर राहिले.हा फायदा उठवत न्यायालाकडून चौकशी खातरजमा वगैरे सोपस्करशिवाय अटक न करण्याचा निर्णय घेण्याची संधी साधली गेली.
अशी वस्तुस्थिती असतानाही सरकारची बाजू घेत केंद्रीय समाजकल्याणमंत्री म्हणाले की यात सरकार कमी पडलेलं नाही.आम्ही रिटपिटीशन दाखल करू.आणि न्यायालयाला निर्णयाबाबत पुर्नविचार करायला लावू.
आपण अॅट्रोसिटी हा शब्दही कधी आयुष्यात ऐकलेला नसतो परंतु तरीही हा जाचकच असेल असं आपलं मत आजूबाजूचा प्रोपौगंडा पाहून बनू लागतं. गोबेल्स नीती हीच असते सतत एक गोष्ट सांगत राहिलं की कालातंराने ती खरी वाटू लागते.असे प्रोपौगंडा फैलावणारे लोक सतत असं म्हणत राहतात तेव्हा ते खरेच असेल.असा काही लोकांचा समज होतो.
अरे पण तुम्ही स्वत:मनापासून विचार करून पहा ना आयुष्यात तुम्हाला कधी याचा त्रास झालाय? गंमत म्हणजे असा निर्णय देताना न्यायालयापुढे कोणतीही ठोस आकडेवारी उपलब्धच नव्हती अशी नवी माहिती समोर येते आहे.
याचा अर्थ न्यायालयाने हा निर्णय पक्षपातीपणा करत दिलेला आहे आणि आपल्याच गरीमेला ठेस पोहोचवली आहे.असे करून न्यायालयाने सामान्य लोकांच्या मनातील न्यायालयाप्रती असणारा आदर सन्मान यांनाही तडा दिलेला आहे.
न्यायालाकडून मुद्दाम चुकीचा निर्णय घ्यायचा आणि मग ती चूक आम्ही दुरुस्त करतो आणि तुमचं संरक्षण करतो आम्हीच तुमचे कैवारी आहोत असा आव सत्ताधारी पक्षाला आणायचा आहे.असे एकूण परिस्थिती पाहता लक्षात येते.
उद्या पुन्हा न्यायालयाने निर्णय बदलला तर न्यायालय सरकारच्या तालावर नाचते हे सिद्ध होणार आहेच.परंतु आपल्याच निर्णयाला बदलत आपण जनतेचा विश्वास गमावत आहोत हेही सिद्ध होणार आहे.अन मुळात हा खेळ कशासाठी? तर स्वत:ची मलीन प्रतिमा सुधारण्यासाठी.
विनोदाचा भाग असा आहे की सरकारला न्यायालयात कशाला जायचं आहे?
कायदे संसद बनवते म्हणजे सरकारच बनवत असते त्याचा अर्थ आणि त्याची अंमलबजावणी केवळ न्यायापालिकेला करायची आहे.
कायदे न्यायपालिका बनवणार नाही असे निर्देश आहेत.असे असताना न्यायालाकडून हा कायदा कमकुवत करण्याचा झालेला प्रयत्न देखील भयंकर आश्चर्यकारकच मानला पाहिजे.
संसदेने नविन नियम पारित करावा.जिएसटी वगैरे जशी रात्रीची सोंगे केली तसे सरकारने युद्धपातळीवर संसदबोलावून नविन नियम जारी करणे देशाच्या हिताचे आहे.
अध्यात्मिक बुवा श्रीरविशंकर यांनी मध्यंतरी देशाचा सीरिया होईल अशी धमकीवजा सूचना केली होती.तद्नंतर रामनवमीपासून देशात ठिकठिकाणी जाळपोळ दंगे सुरु आहेत.श्रीरविशंकर यांनी असे वक्तव्य कोणत्या आधारावर केले? त्यांची नार्को चाचणी करून सत्य बाहेर काढले पाहिजे.
हे रामजादे जेव्हा दंगली जाळपोळ करतात गोराक्षस खून करतात तेव्हा
ते सगळच परम पवित्र कसं काय असतं? हेही समजलं पाहिजे.
आज देशभरात न्यायालाकडून दिल्या गेलेल्या चुकीच्या निर्देशामुळे असंतोष पसरला असून देशातील दलित मागास आंबेडकरी जनता पूर्णपणे सरकारच्या विरोधात असल्याचे चित्र देशभरात स्पष्टपणे दिसत आहे.याशिवाय अमेरिकेतही याचे पडसाद उमटले असून तीथेही सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने झाली आहेत.
मागील दोन महिने करणीसेनेने देशभरात उच्छाद मांडला ठिकठिकाणी जाळपोळ केली.त्या अगोदर जाट गुर्जर आरक्षणवाले पटेल आंदोलन वाले.
ही सगळी आंदोलने हिंसक होती आणि आजच्यापेक्षाही उग्र स्वरुपाची होती.त्यावेळीही भाजपा सरकारच सत्तेवर होते.
असे असताना त्यांनी कुणावरही लाठीचार्ज किंवा गोळीबार करण्याचे आदेश दिले नाहीत.दलित मागासवर्गीय आंबेडकरी समाज एक दिवस रस्त्यावर उतरला तर सात लोकांचा सरकारच्या गोळीबारात खून झालेला आहे.
या अगोदरच्या वरील आंदोलनात किती लोकांचा बळी गेलाय आकडेवारी आहे काय?
राजनाथसिंह यांनी राज्यांना कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे आदेश देत गरज लागली तर केंद्र सरकार जास्तीची मदत करेल मला ट्वीटरवर कळवा अशा सूचना केल्या याला काय समजायचं?
जेव्हा पंजाब दोन दिवस जळत होता तेव्हा अशी समयसूचकता राजनाथसिंह यांना का दाखवता आली नाही? इतरांना वेगळा न्याय आणि आम्हाला कायम पक्षपाती न्याय दिला जातो आणि आतातर न्यायव्यवस्था सुद्धा आमच्या विरोधात उभी राहिलेली आहे.
हा देश आमचा आहे की नाही? या चार वर्षात सरकारकडून कायम आंबेडकरी जनता टार्गेट केली गेलीय.सगळीकडूनच दमन सुरु झाले तर हे कुणाच्याच भल्याचे नाही हे सर्वानीच यावेळी लक्षात घेणे गरजेचे आहे.
आजच्या बंद मध्ये हिंदुत्ववादी लोकांनी घुसखोरी करून बंदला हिंसक वळण देण्याचा प्रयत्न केला अशी माहिती समोर आली आहे.अनेकांनी मात्र यावेळेसही आंबेडकरी समाजाला टार्गेट करणे सोडले नाही.अशा लोकांना उत्तरे देत बसने बंद करून समाजाचे एकत्रीकरण कसे होईल यावर जास्त उर्जा खर्च करणे गरजेचे आहे.
भाजपा सरकार आणि अनुषंगाने व्यवस्था राबविणारे सर्वच हे मनुवादी आंबेडकरी समाजाच्या विरोधात आहेत हे अनेकदा स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळेच इथला दलित मागासवर्गीय आंबेडकरी समाज हा भाजपच्या पूर्णपणे विरोधात आहे.याचे भान सरकारसोबत असणाऱ्या नेत्यांना असायला हवं.सरकारला वाचविणाऱ्या नेत्यांना या सरकारविरोधी संताप असणाऱ्या जनतेला उत्तरे देणे भाग आहे.
- Milind dhumale

गुरुवार, ८ मार्च, २०१८

पुतळ्यांच्या पाडा पाडीत एक मोठा भूकंप



भाजपला धक्का.भाजपचे बुरे दिन सुरु झाले.विरोधी पक्षानी EVM वर मतदान न घेता बलेतपेपरवर घ्यायची मागणी लावून धरली तर लवकरच हा पक्ष संघापुरता मर्यादित होईल.आंध्रप्रदेशाचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी एनडीए युतीतून बाहेर पडत सर्वांना राजीनामा देण्याच्या सूचना केलेल्या आहेत.
आंध्रप्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याबाबतचे आश्वासन न पाळल्यामुळे तसेच नरेंद्र मोदींनी फोनही उचलला नसल्यामुळे अपमानास्पद वागणुकीचा निषेध करत चंद्राबाबू नायडू यांनी तडकाफडकी युतीतून बाहेर पडणे पसंत केले.
महाराष्ट्रात एक असाच निर्लज्ज पक्ष आहे.त्यांना कितीही लाज काढली तरी बिन लाजे सत्तेतच लाळघोटत राहताना दिसतात.नरेंद्र मोदी खूप काम करतात अशी टिमकी नेहमीच वाजवली जाते.ते एक दिवसही सुट्टी घेत नाहीत असंही भक्तांकडून सांगितलं जातं.
मुळात ज्यांना पत्नी नाही.मुलं नाहीत.संसार नाही अन रोज आलिशान जीवन व्यतीत करायला मिळत असेल दररोज विदेश दौऱ्याची मजा घ्यायला मिळत असेल तर कोणता मूर्ख सुट्टी घेईल अन कशाला घेईल? याजागी तुम्ही आम्ही असतो तर आपणही सुट्टी घेतली नसती.
परंतु यांचे दावे किती फालतू उथळ आणि खोटे असतात हे वारंवार सिद्ध होत आले आहे.
मुलांसोबत टाईमपास करणे त्यांना नापास करण्यासाठी फालतू चुकीची पुस्तके लिहून गंडवणे ज्या अर्थी आपल्याला तीनचा पाढा येत नाही.अशा व्यक्तीला उगाचच मोठे करून लोकांच्या माथी मारण्याचे कारस्थान विशिष्ट जमातीने केलेले आहे.
हे तेच लोक आहेत जे समाजात बुवा भगत गुरु साध्वी साधू इत्यादीच्या माध्यमातून समाजातील भोळ्या लोकांना मूर्ख बनवून आपला फायदा करून घेत असतात.हजारो कोटींचे घोटाळे करून विदेशात पळून जात असतात.अशा लोकांनी यावेळी हा लाखोंचे सूटबूट घालणारा गारुडी लोकांच्या माथी मारला.
ज्याला आपल्या सोबत युतीत असणाऱ्या सरकारमध्ये मित्रपक्ष असणाऱ्या आणि त्याही पेक्षा महत्वाचं एका राज्याचा मुख्यमंत्री असणाऱ्या व्यक्तीचा फोन देखील घेता येत नसेल तर असा व्यक्ती प्रधानमंत्री पदावर बसण्याच्या लायकीचा आहे काय? जे युतीतील पक्षांनाही चुना लावतात आश्वासने पाळत नाहीत.ते सामान्य जनतेचे काय भले करणार?




रविवार, ४ मार्च, २०१८

गावठाण मालमत्ता खरेदी करताना सावधान

प्रत्येकाचं स्वत:च घर असावं हे एक स्वप्न असतं.डोक्यावर हक्काचं छप्पर असणं हे रात्री बिछान्यात पडल्यावर लागणाऱ्या शांत झोपेचं एक कारण.छप्पर कसंही असो.अगदी झोपडी ताडपत्रीतही सुखानं झोप लागते.यासाठी आयुष्यभर जमा केलेली काडी न काडी आपण त्यासाठी लावतो.

आपल्या ऐपतीप्रमाणे अंथरून बघून पाय पसरायचं तसं.माझही स्वप्न होतं.अर्थात यात आईवडलांच्या संपत्तीचाच वाटा.तर घाटकोपरचं घर जीथं आयुष्य गेलेलं ते विकून आम्ही शिफ्ट झालो.नवीमुंबईत.बजेटमध्ये घर घ्यायचं होतं.मुंबईत वा उपनगरात कुठेही शक्य नव्हतं.मग शेवटी जवळपास दोन महिने फिरून एका ठिकाणी शोध थांबला.एजंट आपलाच.त्यात गाववाला.त्यामुळे विश्वासाने पाउल टाकलं.

सिडको म्हणजे तशी भीती नव्हतीच.तरीही एजंटनच सांगितलं.वकिलाकडून प्रॉपर्टी सर्च रिपोर्ट करून घेऊया.त्याचे दोन हजार घेतले.ते त्याने वकिलाला दिलेच नाहीत हे नंतर वकिलाकडून समजलं.सर्च रिपोर्टमध्ये सदर रूम कुणाला विकली असेल किंवा तिच्यावर काही लोन काढले असेल तर त्या नोंदी समजतात.रूम रिसेल होता.म्हणजे तसा रिसेल नाही.तर त्यात भाडोत्री होते.

बुकिंग करून घेतो तसा नव्हता.रेडी पजेशन.वकिलाने क्लीअर आहे असं सांगितलं.विशिष्ट बजेटला रूम नक्की केला.रुममध्ये थोडं काम होतं म्हणून तो बजेटमध्ये बसला.थोडेफार लोन.ठीकय म्हणून पुढे सौदा केला.खूप घासाघीस झाली.रूम मालकाचा साडेबाराटक्केचा प्लॉट त्यावर ही इमारत.मालकही बिल्डरच.कामे घ्यायचा.

त्याच्या अलिशान ऑफिसमध्ये डील झाली.ज्यूस वगैरे सोपस्कर.पेमेंट कसं करणार वगैरे ठरलं.
मला कुणाला तंगवायला आवडत नाही.अडवणूक करणे आपला स्वभाव नाही,याउलट पेमेंट करून जेवढे लवकर मोकळे होऊ तेच बघतो मी.आज नाहीतर उद्या द्यायचंच असतं कशाला डोक्याला ताप अशी आपली वृत्ती.टोकन म्हणून त्याला रीतसर एक लाखाचा चेक दिला.

त्याचा चलन अन एमओयु बनवला.जागा आईच्या नावाने म्हणून त्याच्या आईच्या नावे सगळे पेपर बनले.
चेक देताना मी lacs अशी स्पेल केलं होतं जे आता चालत नाही लाख असं लिहावं लागतं.मग मालक गाडी घेऊन आला आणि मला बँकेत घेऊन गेला.सगळे व्हाईट मध्ये.कायदेशीर.सदर रुममध्ये किचन आणि बाथरूमचे काम करून घ्यायचं होतं.त्याचा खर्च दीड पर्यंत सांगितला होता.

कंत्राट घेणारा एजंटचाच एक भावोजी होता. त्याला प्रत्यक्ष काम दाखवायचं होतं.दुसऱ्या आठवड्यात त्याला घेऊन आम्ही रूमवर गेलो.तीथं एक मुस्लीम व्यक्ती (शेखभाई)रूम पहायला अगोदरच आलेला.तो एजंटचा ओळखीचा.दोघांनी हाय हैलो केले.मग त्याने दोन रूम बुक केल्याचे समजलं.

त्याने वरही (पहिल्या माळ्यावर)एक रूम बुक केल्याचे समजलं.आम्हाला त्याबद्दल फार काही जास्त उत्सुकता नव्हती त्यानेच विचारलं नक्की कोणती रूम?मग त्याला घेऊन गेलो.तेव्हा माझ्यापेक्षा तोच जास्त गर्भगळीत झाला.म्हणाला "साहब इसका पेमेंट अभी अभी सिडको मै भर कर आ रहा हुं | चलो पेपर दिखाता हुं"
तो खाली घेऊन आला.गाडीतून पेपर काढले.

flat नंबर बरोबर होता.माझ्या तोंडाला सोकड पडली.मी टोकन द्यायच्या अगोदरच हा सौदा झालेला त्यामुळे ही फसवणूक धक्कादायक होती.पण दुसऱ्याक्षणी सावरलं स्वत:ला.माझ्या जागी दुसरा असता तर स्ट्रोकने आडवा झाला असता.धक्काच असा होता.घराचं स्वप्न डोळ्यात साठलेल्या पाण्यात विरघळून गेलं.बाहेर पडू दिलं नाही.

मालकाला फोन केला.एजंट अन शेखभाई मला टेन्शन घेऊ नको असं सारखं सांगून धीर देत राहिले.
न तुमचे पैसे बुडणार नाहीत याची मी खात्री देतो असं शेखभाईने सांगितलं.तेव्हा थोडा जीवात जीव आला.एक लाख ही आपल्यासाठी खूप मोठी रक्कम आहे.तसे मी करोडो बघितले रेकोर्सला.कमावलेही थोडेफार (करोड नाही.pls नोट) पण ही रक्कम आजही जास्तच आहे.

मालक आला.आणि शेखभाईला म्हणाला "मैने आपको मना किया है आपका पैसा नीचे वाले रूम मै एडजस्ट करता हुं" रोशन भडकला म्हणाला तू आमच्याघरी येवून पाया पडून गयावया करून पैसे घेऊन गेलास आणि दोन्ही रूम घ्या म्हणाला होता.आता पलटी मारू नकोस..हवेतर यांचे पैसे मी देतो.मालक उडवाउडवी करू लागला.मग रोशनने फोनकरून बायकोला बोलावले.
भाभी धावतच आली.आल्या आल्या शिव्या द्यायला सुरुवात.मालक घाबरला.वरमला.मला म्हणाला तुम्हाला काय करायचं? मला एकदा अनुभव आला की परत त्या वाटेस जात नाही.सुरुवातीलाच धोका म्हणून मग माझं मनच तयार होईना.मन मोडलं होतंच.आणखी पुढे काही लीगल झमेला नको.हा विचार करून मी हा रूम नको सांगितलं.पैसे परत करा एवढंच शांतपणे म्हणालो.

शेखभाई म्हणाला आप टेन्शन मत लो आपका पैसा मै देता हुं इनसे मत लेना.मालकासमोर हे सांगितल्यावर मला जीवात जीव आला.दुसऱ्या दिवशी एजंटला घेऊन आम्ही शेखभाईच्या घरी गेलो.त्याने चहा दिला.मग चेक दिला.25 तारीख टाकली.आणखी वीस दिवस अवकाश होता.

शेखभाईला दोन्ही रूम हवेच होते. त्यामुळे तो मला सारखं धीर देत पैसे बुडणार नाहीत मी देतो बोलत राहिला.मी ठरवलं असतं तर रूम घेऊ शकलो असतो.तुम्ही उगाच नकार दिला मी शेखला थांबवलं असतं माझा जुना दोस्त आहे तो असं एजंटही म्हणाला.पण एकदा मन मोडलं की काही अर्थ उरत नाही.आम्ही चेक घेऊन बाहेर पडलो.दुसरा रूम शोधू लागलो.चेकमुळे अर्धा जीव भांड्यात पडला होता.

पण त्यासाठी आणखी वीस दिवस चेक क्लियर व्हायची वाट बघत बसावं लागणार होतं.दुसरा रूम सिलेक्ट केला.त्यांना हे घडलेलं प्रकरण सांगितलं.सगळं पेमेंट चेकने दिलं.आणि यावेळी सुरुवातीला फक्त दहा हजारच टोकन म्हणून दिलेले.एक लाख बाकी होते.पेपर बनवले.सह्या झाल्या.

दरम्यान मी चेक बँकेत टाकला.तो आठवडाभराने 150 रुपये बाउंस चार्ज लावत रिटर्न आला.शेखभाईनेही मारली होती.त्याला फोन केला तर म्हणाला मालक म्हणाला टाकू नको.चिडून मालकाला फोन केला तर पुन्हा उडवाउडवी सुरु.ऑफिसला भेट म्हणालो दोघेही टाळत राहिले.इकडे जो रूम घेतला त्यांनी उरलेले पैसे फेडा म्हणून तगादा लावला.डोकं चालत नव्हतं.शेखभाईला आठवण करून दिली.

तो चिडून वैतागून  म्हणाला "आप दोनो का व्यवहार हुआ था मुझे बीचमे मत घसीटो",
त्यावेळी मालकाने फसवल्यापेक्षा याने जो दिल दर्या गांड समंदरपणा दाखवलेला त्याची विलक्षण चीड आलेली.कारण चेक दिला तोही वीस दिवस उशिराचा त्यात बाउंस करून माझं बँक रेकॉर्ड खराब वर चार्जेस वेगळे अन आता म्हणतोय मुझे बीचमै मत घसीटो? 

हेही बरोबर होतं.मी उगाच त्याच्यावर विसंबून राहिलो.त्याचा तसा तांत्रिकदृष्ट्या संबंध नव्हताच.शेवटी मालकाच्या ऑफिसला फेऱ्या सुरु झाल्या.रोज जायचं.रोज टाचा घासायच्या.मग चार महिन्याने दिवाळीत मागेपुढे त्याने पन्नास हजार दिले.बाकीचे चारपाच दिवसात देतो म्हणाला.त्यावेळी अमोल जाधव हा मित्र सोबत होता,मी घेत नव्हतो मला पूर्ण रक्कम हवी होती.

तो म्हणाला भागते भूत की लंगोटी म्हणून घे..जे मिळतेय घ्यायचं.आपण चुकलो असं समजून गप्प बसायचं.तेही ठीकच होतं.माझाही अर्धा जीव आला.ते पैसे थेट बँकेत भरून त्याचदिवशी पन्नासचा चेक नवीन घर मालकाला सुपूर्द केला.आता फक्त पन्नास उरलेले.पुन्हा मालकाच्या ऑफिसला फेऱ्या आज देतो उद्या देतो हेच सुरु.नाही देणार असं आजतागायत बोलला नाही पण दिलेही नाहीत.

नवीन मालकाने पुन्हा उरलेल्या पैशासाठी तगादा लावला.मालकीणबाई दारात येवूनच ओरडून बोलायची मोठ्याने आपण लाजून मरून जावं असं वाटायचं.डोकं चालत नव्हतं.शेवटी बायको म्हणाली आपल्या घरात इमर्जन्सीला असतं ते करा.मग घरातले डाग गहाण ठेवले.त्यातून हे देणं भागवलं.त्याचं व्याज आजही भरतोय.
हे सांगायचं एक कारण की गावठाणमध्ये चुकनही कधी व्यवहार करू नका.कितीही चांगलं असू दे तुम्हाला घोडाच लागणार आहे.

एक दिवस त्याच्या घरी गेलो.त्याच्या आईला भेटलो.वाटलं आईला सांगितलं तर आई त्याला जाब विचारेल दमात घेईल.पेपर तिच्यानावाने होते अंगठा घेतला होता याने.त्यामुळे तिच्या हे कानावर गेलं पाहिजे असं वाटलं.अन त्याला बर्डन यावं ही इच्छा होती.त्याच्या आईला व्यथा सांगितली.आईने व्हय व्हय पोरा म्हणत ऐकून घेतलं आणि मग "मला कायपन मैइत नाय या डोकर्याने काय केला.फक्त मांजा आंगठा नेला छापून बै मला कै बी मायीत नाय" असा पवित्रा घेतला.

काय बोलणार परत घरी आलो.मोदीने नोटबंदी करून अगोदरच कंबरडे मोडले होते.
पुन्हा फोन पुन्हा ऑफिसला चकरा सुरु केल्या..मध्यंतरी पोलिसात जावं असं खूप वाटायचं पण आमची आई नको म्हणायची.यांचा भरवसा नाही.तुझ्या जीवाला बरं वाईट करतील ती लोकं.यांचा काय भरवसा नसतों अशी तीची काळजी.साला पैसे आपले आणि घाबरायचंही आपणच.

त्याच्यावर खरेतर एट्रोसिटी बनू शकली असती.जात सांगत नाही.उगाच इथं वेगळा विषय सुरु व्हायचा.त्यात प्रत्येक गोष्टीत एट्रोसिटी आणून ती स्वस्त नव्हती करायची.म्हणून मी ते टाळले.लोक मात्र पैसे उकलण्यासाठी एट्रोसिटीचा वापर करतात अशा कहाण्या रचून वात आणतात.इथं लुटलेले पैसे वाचवायला ते पाउल नको वाटायचं.पोलिसांकडे जावून फसवणुकीची केस तरी करावी असं वाटत होतं.

तर आई म्हणाली आपण घरी जाऊन त्याच्या बायकोला समजवू तुझ्या नवऱ्याला पैसे द्यायला लाव वगैरे बोलूया.तीचं तरी ऐकेल.बघूया.मग आम्ही मी पत्नी आई त्याच्या घरी गेलो.कित्येक महिने तो फोनच उचलत नव्हता.कधी उचलला तर देतो काय पळून चाललो काय?दिले ना अर्धे ? अशीच भाषा कायम. त्याच्या रूमवर गेलो तिसरा माळा.तो घरीच होता.त्याला बघून माझा संयम सुटला.

घरी आल्यामुळे तो अडचणीत आला होता.सगळं ऐकत होता.गप्पा माझा आवाज चढला.त्याची बायको आली आवाजाने खाली. कोणय ..? हे यांच्ये पैशे घेतलेस..देवा किती लोक घरी येणार असे? काय लाज शरम ..तुला सोडून जाईन मी राहणार नाय इथं..

(मला मनातून बरं वाटलं याला शिव्या पडू लागल्या..)

अन मग एकाएकी तीनं आमच्याकडे मोर्चा वळवला.त्यादिवशी तुम्हीच आलेला का आईकडे? 
मी हो म्हणालो.तर म्हणाली 
"परत यायचं नाय इथं.आणि या घरातपण यायचं नाय.तुमचा व्यवहार ऑफिस मध्ये झालाय ना मग तिकडेच काय ते मिटवायचं.असे कित्तेक लाख थुंकलेत मी..आता जर परत या घराची पायरी चढला तर याद राखा,माज्या सारखी वाईट कुणी नाय..पोलिसात तकरार करेन आम्हाला मारायची धमकी देतात हे लोक म्हणून.."

आम्ही सगळे सर्द झालो.एकमेकांकडे बघायला लागलो..आमची आई तीला मी जगाशी भांडताना पाहिलंय ते बघतच मोठा झालो मी पण आज तीही गप्प होती.हल्ली आई थकल्यामुळे या गोष्टी टाळते मग मीही आवरते घेतले.उगाच आईला आणखी त्रास नको.

मालकाला म्हणालो पैसे लवकर रिटर्न कर.आमचेच पैसे मागायला घरी यायचं तू ऑफिसला सापडत नाही फोन उचलत नाही आणि मग घरी आलो तर अपमान करून घ्यायचं? एवढी बायको शेठच्या पोटची आहे तर देवून टाकना आमचे पैसे तर..त्याची बायको  म्हणाली "माझ्याशी व्यवहार केला असता तर तुम्हाला घरी येवून दिले नसते, हा भाडखाऊ आहे त्याने केलाय व्यवहार त्याच्या ऑफिसला जा काहीही करा."

त्यावर आम्ही बाहेर पडलो.असेच दोन तीन महिने गेले.आज उद्या आज उद्या करत मध्यंतरी त्याने त्यातले काही पैसे परत केले.आता त्याच्या जोर वाढला.आता दिले ना एवढे काय बुडवले का? देणार ना? नाही म्हणालो का? असं चालू असतं.

त्याने एक बारवाली ठेवलीय.तीला वन बीएचके flat घेऊन दिलाय सोनेनाणे घरी बायकोलाही माहित आहे.
अशा लोकांच्या घरचेही आई असो बायको सगळे निर्ढावलेले सराईत असतात हे अनुभवलं.
ही एक गोष्ट ज्यामुळे मी इथं काही दिवस फेसबुकवरही नव्हतो.बराच डिस्टर्ब होतो.
अन नंतर आयुष्यात एकामागून एक अशा गोष्टींची मालिकाच सुरु झाली.
आज फोन केला होता.आले की देतो...देणारच मी काय पळून जातोय..? असं बोलून फोन कट केला...!









शुक्रवार, २ मार्च, २०१८




सीरियातील युद्धात मारले गेलेल्या लहानग्यांचे फोटो सोशल मीडियात वायरल झाले.त्याने अनेकजण हेलावून गेलेत.लहान मुलांची कलेवरं पाहून मन हेलावून जाणं साहजिकच.त्यांचे शांत निपचित चेहरे अंगावर येतात.या युद्धामुळे आतापर्यंत जवळपास 5 लाख लोक मृत्युमुखी पडलेत.युद्धात काय प्रकारची परिस्थिती उद्भवू शकते हे बघून मन हेलावून जातंय.एक संपूर्ण शहर स्मशानात बदलून गेलंय.इमारती घरं उध्वस्त झालेत.रस्त्यावर प्रेतांचा खच.इमारतींच्या ढिगाखाली गाडले गेलेले मृत तर काही जिवंत जीव.जमिनीतून अंकुर फुटून वर यावा तसे वाचलेले लहानगे जीव रडत बाहेर काढले जातायत.

हे का सुरु आहे? एवढं कौर्य कशासाठी? यामागे काय मोटिव्ह आहे? असे अनेक प्रश्न अनेकांना पडले असतील.मराठीत यात फार कमी किंबहुना लिहिलेलंच नाही.माहिती थोडी दीर्घ स्वरुपात आहे.
त्यामुळे कंटाळा येवू शकतो.ज्यांना यात रस आहे त्यांनी पुढे जावं.

सीरीयात जे युद्ध सुरु आहे त्यास अनेक गोष्टी कारणीभूत आहेत.एकच एक कारण नाही.
सीरीयात मरणारे आणि मारणारे हे एकाच धर्माचे.संपत्तीचा हव्यास,तेलसाठे, धार्मिक सत्ता,राजकीय सत्ता 
अन एकमेकांच्या प्रती असणारा द्वेष.या कारणातून हे सर्व सुरु आहे.परंतु.यात केवळ एकच किंवा दोन पार्टी/पक्ष नाहीत.

एकावेळी अनेक देश अनेक संघटना यात सामील आहेत.हे समजून घेताना डोके अक्षरशः गरगरायला लागते.
तिसऱ्या महायुद्धाची ही मीनी आवृत्ती आहे असं म्हणनं अतिशयोक्ती ठरणार नाही.
सीरियन सरकार/शिया/सुन्नी/आयएसआयएल-इस्लामिक स्टेट ऑफ इराक एंड लेव्हंट यांना आयसीस म्हणूनही ओळखले जाते/कुर्दिश सेना/एफएसए-फ्री सीरियन आर्मी/स्थानिक विद्रोही ग्रुप्स/अल-कायदा/अमेरिका/नॉर्थ कोरिया/rरशिया/तुर्की/इराण/इराक आणि जॉर्डन

एकाच देशात हे सगळे एकमेकांवर तुटून पडले आहेत.एकमेकांचे लचके तोडत आहेत.
सगळेच रक्ताला चटावले रक्त पिपासू बनलेले आहेत.

यामागे एक प्रमुख क्रूर चेहरा आहे बशर-अल असाद याचा.जो आज सीरियाचा सत्ताधारी हुकुमशाह आहे.हा घराणेशाहीचा वारसदार.त्याचे वडील हाफिज-अल असाद यांनी 1971 ते 2000 एवढी प्रदीर्घ काळ सत्ता भोगून 2000 साली बशर-अल असादला सुपूर्द केली.तेव्हापासून तो तिथं सत्ता भोगत आहे.इंग्लंडमध्ये शिक्षण घेतल्यामुळे स्वभावाने प्रोग्रेसिव्ह असणारा बशर-अल असाद तेवढाच निर्दयी क्रूरकर्मा आहे.सत्ता हस्तगत करण्यासाठी त्याने राज्यघटनेत हस्तक्षेप करत दुरुस्ती करून घेतली आणि सत्तारूढ झाला.

सत्तेवर आल्यानंतर त्याने तुरुगांतून दहशतवादाचे आरोप असणारे तसेच राजकीय आरोप असणारे कैदी सोडून दिले.अन आपल्या पदरी घेतले.आणखी जे वडिलांच्या कार्यकाळात त्यांच्याशी प्रामाणिक होते त्यांना तुरुगांत टाकले.जे त्याच्या धोरणांना विरोध करत होते.

हुकुमशाहीची नशा झाल्यांनतर त्याने लेबनानच्या हिजबुल्लाह या शिया-जिहादी लोकांच्या अतिरेकी संघटनेशी हात मिळवले.हिजबुल्लाहचा अर्थ पार्टी ऑफ गॉड किंवा पार्टी ऑफ अल्लाह असा आहे.हसन नसरूल्लाह हा या संघटनेच नेता.लेबनानमध्येही गृहयुद्ध झालेलं आहे.यात हिजबुल्लाह संघटनेचा हात होता.त्यास इराणचे आर्थिक समर्थन मिळाले होते.

बशर-अल असाद आत्मकेंद्री आहे.स्वत:च्या प्रतिमेत बुडालेला.शहरात प्रत्येक चौक आणि उंच इमारतींवर त्याचे मोठे मोठे होर्डिंग्ज-फोटो पहायला मिळतात.स्वतःच्या फोटोचा तो शौकीन आहे.तसेच त्याने तिथल्या प्रसारमाध्यमांवर ताबा मिळवलेला आहे.

बशर-अल असादचा विचार केला तर त्याच्या आणि भारताच्या अलीकडच्या परिस्थितीत अनेक साम्य आढळून येतील.सीरियाची स्क्रिप्ट भारतासाठीही लागू होते अन पुढे होईलही अशी काळजीयुक्त भीती वाटते.
गेले काही दिवस सोशल मिडीयाच्या माध्यमांतून लहानग्यांचे जे फोटो येत आहेत तो एक प्रोपेगंडाचा भाग वाटतो.

सीरिया अन तीची राजधानी दमास्कस,एलेप्पो येथे झालेले रॉकेटहल्ले आणि त्याहून भयंकर म्हणजे उत्तर कोरियाने पुरवलेल्या केमिकल्स युक्त शस्त्रसाठा ज्याचा वापर बशर-अल असाद ने तिथल्या रिबेलीयंसवर केला.यात लाखो लोक मृत्यूमुखी पडलेले असले तरी सोशल मीडियात मात्र लहानग्यांचे फोटोच वायरल झालेले आहेत.आपण हे लक्षात घेतलं पाहिजे.करण हे ठरवून केलेलं आहे हे स्पष्ट.
यामागे अमेरिकेची यंत्रणा असू शकते असा एक तर्क आहे.


या युद्धाची सुरुवात कुठून कशी झाली?
मिडल इस्ट देशात 2011 पासून अरबस्प्रिंग म्हणून एक संज्ञा प्रचलित झाली.त्याला कारणीभूत ठरला.एक सामान्य फळ विक्रेता.आणि हाच सामान्य फळ विक्रेता आज संपूर्ण मिडलइस्टच्या असंतोषाचा जनक मानला जातो.अरबस्प्रिंगचा अर्थ बहार-ए-अरब किंवा अरबी वसंत ऋतू.मोहम्मद बुअजीजी (26) हा तो सामान्य फळ विक्रेता.ट्युनिशियाचा.तो हातगाडीवर फळ विकायचा,अविवाहित.वडील वारलेले.आठ सदस्य असणाऱ्या कुटुंबाची जबाबदारी.त्याच्यावर.

त्याला ट्युनिशियनपोलीस रोज त्रास द्यायचे.हप्ता म्हणून गाडीवरील टोपलीभरून फळे उचलून घेऊन जायचे.
अल अबिदीन बेन अली ट्युनिशियाचा प्रधानमंत्री कम हुकुमशहा.कायर्काळ 1987 ते 2011.
याची सत्ता घालवली या सामान्य फळविक्रेत्याने.

फैदा ह्म्दी या पोलीसकर्मचारी महिलेने त्यादिवशी त्याची फळे उचलून कार मध्ये ठेवली.
मोहम्मद बुअजीजी गयावया करू लागला.रोजच्या त्रासाला कंटाळलेला.आज बोहनी सुद्धा झालेली नव्हती.
इतर पोलीस हसत होते.तो वरिष्ठाकडे गेला.तीथेही त्याच्यावर हसले गेले.मग तो मुख्य कार्यालयात तक्रार द्यायला गेला.सामान्य माणसांच्या सरकारी सिस्टम सोबतच्या व्यथा वैश्विक.तीथेही त्याला उडवून लावले गेले.हा सगळा घटनाक्रम चाळीसपन्नास लोक बघत होते.त्याच्या अन्यायाचे हे सर्व साक्षीदार.

वैतागून हताश होऊन मोहम्मद बुअजीजीने स्वत:ला पेटवून घेतले.आत्मदहन केलं.जमावाने वाचविण्याचा असफल प्रयत्न केला.तासभर मोहम्मद तिथेच पडून होता.पोलीस बघत होते.तो शहीद झाला.लोक चीडले.त्यांनी ठरवलं.आता बस झालं,सोशल मीडियातून हाक दिली.मोर्चे निघाले.सरकार उलथवून टाकलं.ही सामान्य लोकांची ताकद.त्याला आदर्श मानून मिस्र आणि लिबियात सोशल मीडिया पेटर्न राबवून क्रांती झाली.हुकुमशाही सरकारे उलथवून टाकली गेली.या घटनांचा मिडलिस्ट देशात प्रभाव पडला.नागरिकांना प्रेरणा मिळाली.

आता येवू सीरियात-

2011
सीरियात गेली चार दशके असाद घराण्याची सत्ता आहे.तिथला रोजगाराचा प्रश्न आणि वारंवार कुर्दिश समाजाकडून वेगळा कुर्दिस्तानाची मागणी यामुळे अगोदरच काही प्रमाणात असंतोष खदखदत होता.
बशर-अल असाद निवडून येण्यासाठी त्याने रोजगार देण्याचे जाहीरनाम्यात सांगितलं होतं.जे वचन त्याने पाळलं नाही.
बेरोजगारीला कंटाळून सीरियातील हॉम्स शहरात निदर्शने झाली.पोलिसांकडून त्यातील काही तरुणांना छळ करून मारण्यात आलं.त्याच्या निषेधार्थ नागरिकांनी मोठा मोर्चा काढला.यामोर्च्यावरही बळाचा वापर करत पोलिसांना मुक्त गोळीबार करण्याचा आदेश देवून हा मोर्चा चिरडून मोडीत काढण्याचा प्रयत्न झाला.ज्यात अनेक तरुण मारले गेले.अन याची परिणीती म्हणून नागरिकांनी चिडून बशर-अल असादच्या हुकुमशाही विरुद्ध हत्यारे उपसली.आणि लोकशाही राष्ट्राची मागणी केली.यांना विद्रोही म्हणले जाते(रिबेल)या गटाने सरकारच्या विरोधात उघड भूमिका घेतली.त्यांची असादसोबत आजही हीच लढाई सुरु आहे.
त्यांना हत्यारे पुरवली अमेरिकेने.

तिथला उच्चभ्रू वर्ग-व्यापारी वर्ग बशर-अल असाद सोबत आहे.कोणत्याही समजातील हे घटक कायम सत्ताधारीशी सोबत करतात.बशर-अल असादने नागरिकांवर अंधाधुंद अत्याचार सुरु केला.नागरिकांवर केमिकल बॉम्बचा वर्षाव करून संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अनेक ठरावांपैकी एक रासायनिक  शस्त्रांचा वापर प्रतिबंधित आहे.यात प्रामुख्याने रिबेलीयस ग्रुप्स टार्गेट होते.अन याचा दुसरा अर्थ स्थानिक नागरिक.
ज्या लहान मुलांना आपण पाहतो तो असादचा पराक्रम.सीरीयातील नागरिक बशर-अल असाद मरावा म्हणून दररोज प्रार्थना करतात. 

अबू ह्नीन हा बशर-अल असादच्या आर्मीतील एक मोठा अधिकारी.त्याला असादच्या दहशतीबद्दल विचारलं तर तो म्हणाला,
"तुम्ही नागरिकांना विचारा आम्ही तर त्यांची सुरक्षा कशी करता येईल याचीच सतत काळजी करत असतो"
"आम्ही स्वातंत्र्यसैनिक आहोत." जेव्हा त्याला असं विचारण्यात आलं की असादने लाखो लोकांना मारलं आहे.लाखो जीव वाचविण्यासाठी पलायन करून गेले आहेत.त्यावर तो थोडा स्तब्ध झाला.मग विचार करून एकदम उसळून म्हणाला.

"हे बघा जे झालं त्याच्याशी आम्हाला काही देणेघेणे नाही,असाद आमचा अभिमान आहे.तो प्रधानमंत्री आहे आणि तोच पुढेही प्रधानमंत्री असणार आहे. तो खूनी नाही,त्याने लहान मुलांना स्त्रियांना मारलेलं नाही,ज्यांनी चूक केली त्यांना त्याची शिक्षा मिळाली.यासाठी ते स्वत:जबाबदार आहेत.त्यांनी स्वीकार करो अगर ना करो बशर-अल असाद हा कायम राहणार आहे"

सीरियन नागरिक रानिया मुस्तफा अली त्यावेळी 20 वर्षाची होती.राक्का-कोबान मधून तीनं स्मगलरच्या मदतीने पलायन केले.स्मगलर आयसीस आणि इतर जिहादी पैसे दिले की सगळ्या गोष्टी करतात.त्यासाठीच सर्व सुरु आहे.जगात स्थलांतर करण्याऱ्या देशात सीरिया क्रमांक एक वर आणि आपला भारत नंबर दोनवर आहे.(अभिनंदन)

आयलान कुर्दिशचा वायरल झालेला फोटो आपल्याला आठवतच असेल.तो याच दरम्यानचा.असाच पलायनात बोटीत बळी गेला होता.रानियाने पलायन केलं तेव्हा तीला ज्या बोटीत एजंटने बसवले त्या बोटीची 15 लोकांची क्षमता असताना 52 लोक अक्षरशः एकावर एक कोंबले होते.तीही बोट उलटणार होती.सुदैवाने एक मोठी बोट जवळून जाताना भर समुद्रात त्यांना रेस्क्यू करण्यात आलं.

पुढे निर्वासित छावण्यात पावसामध्ये राहणे.पुन्हा त्या छावण्यांवर रबरी गोळ्या अश्रुधुराचे हल्ले.बलात्कार शोषण सुरूच होतं.पलायन करणाऱ्या नागरिकांत व्हीलचेअरवर असणारे दोन लोक होते ज्यांना सोबतचे लोक नदी पलीकडे घेऊन जाताना दिसतात,छावणीत असणारी नुकतीच चालू लागलेली दोन अडीच वर्षाची काही पाळण्यातली लहान बाळं या सगळ्याच माणसांची जगण्यासाठीची धडपड आणि मृत्यूचा पाठलाग अन यास कारणीभूत माणूस म्हणून आपण किती क्रूर वागू शकतो हा विचार तुम्हाला अस्वस्थ करून निद्रानाश देवू शकतो.

रानिया मुस्तफा अली सुदैवी ठरली तिच्यासोबतचे इतरही.मात्र लाखो लोक जे मृत्यू पावले आणि आजही मृत्युच्या दाढेत जीव मुठीत घेऊन प्रतीक्षा करत आहेत त्यांच्याबद्दल आपण केवळ प्रार्थना करू शकतो.
बशर-अल असाद सीरियन सरकारच्या अत्याचाराविरुद्ध असणारे रिबेल ग्रुप.
शिया-सुन्नी यांचा धर्मांतर्गत श्रेष्ठत्वाची लढाई.आयसीसची खलीफा (मुस्लीम धर्माचा एकमेव सर्वोच्च नेता)बनण्याची महत्वाकांक्षा एकच देव अल्लाह बाकी सगळे काफिर मृत्यू अटळ अशी धारणा.कुर्दिश लोकांचा वेगळा कुर्दिस्तानची मागणी,सीरियातील तेलसाठे.इराण इराक.रशिया यांची त्यावर असणारी नजर.अमेरिका उत्तरकोरियाला संपविण्याच्या पवित्र्यात आहे.तसेच तेलसाठ्यावर देखील कब्जा करण्याची मंशा आहे.त्यामुळे उत्तर कोरियाने केमिकलशस्त्र पुरवठा केला असा व्हाईटहाउसने आरोप केला आहे.या सगळ्याचा हा परिपाक.

भारताने यात काहीही भूमिका घेऊ नये तटस्थ राहणे हीच एक भूमिका असली पाहिजे.

आज कोण कुणाविरुद्ध आहे -

बशर-अल असाद सीरियन सरकारविरुद्ध - रिबेल ग्रुप/ यांना अल-कायदा नंतर जॉईन झाली.
बशर-अल असाद सीरियन सरकार विरुद्ध - कुर्दिश आर्मी 
बशर-अल असाद सीरियन सरकार विरुद्ध - जॉर्डन 
बशर-अल असाद सीरियन सरकार (शिया) विरुद्ध - सुन्नी आर्मी 
बशर-अल असाद सीरियन सरकार विरुद्ध - अमेरिका
बशर-अल असाद सीरियन सरकार विरुद्ध- आयसीस (अल कायदा फुटली तीचं हे रूप)
आयसीस विरुद्ध - रिबेल ग्रुप्स/अमेरिका/कुर्दिश आर्मी एंड यस रेस्ट ऑफ द वर्ल्ड 
टर्की विरुद्ध - बशर-अल असाद सीरियन सरकार /कुर्दिश/आयसीस/रशिया 
रीबेल्स विरुद्ध - रशिया 
इराण विरुद्ध - रिबेल ग्रुप/कुर्दिश

थोडक्यात ठळकपणे 
बशर-अल असाद/हिजबुल्ला/रशिया/इराण एका बाजूला 
बाकी सगळे एका बाजूला.
यात एक बाजू शिया विरुद्ध सुन्नी मुस्लीम जगत

- मिलिंद धुमाळे

संदर्भ - 
रिपोर्ट 2010 ते 2016 
द गार्डियन 
अल जझिरा 
द डिप्लोमेट 
व्हाईस न्यूज 
सीबीसी वर्ल्ड न्यूज 
वाशिंगटन पोस्ट 
बीबीसी न्यूज
and YOUTUBE

मंगळवार, २० फेब्रुवारी, २०१८

वैचारिक प्रबोधन हे सर्वांच्याच हिताचं आहे

सोशलमीडिया हा एक स्फोटक प्लेटफोर्म आहे.इथं तुम्ही जे लिहिता त्याचे पडसाद बाहेर उमटत असतात.तसेच तुमच्या वेळोवेळी घेण्यात आलेल्या भूमिका तुमची विश्वासार्हता आणि इमेज निर्माण करत असतात. तुम्ही समाजाच्या वतीने जेव्हा लिहिता तेव्हा तुम्ही समाजाचे प्रतिनिधित्व करत असता.

कोणताही समाज आपल्यावतीने कुणालाही नेमत नसतो. प्रत्येकजण आपापल्या परीने अक्कलहुशारीने अन जबाबदारीने व्यक्त होत असतो.त्यामुळे या स्फोटक प्लेटफोर्मवर लिहिताना आपण आपल्या समाजाची पत जाणार नाही.त्यास लांछन लागणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.हे सर्वच समाजासाठी आहे.
आता मुख्य मुद्यावर येतो. मराठा क्रांती मोर्चाच्या काळात सोशल मीडियात अन बाहेरही जाणीवपूर्वक आंबेडकरी समाज टार्गेट केला गेला. हे कितीही नाकारा हेच सत्य आहे.मला आठवतं लातूर भागात एका अजाण मुलीच्या भाषणाने काहींच्या डोक्यात तिडीक गेली.भाषा चुकीची नव्हती भावना चुकीची नव्हती संदर्भ चुकले कारण मुद्दा वैयक्तिक होता,त्यावर मीही स्पष्ट शब्दांत लिहिलं होतं.की असे नॉनइशू उभे करून समाजाला अडचणीत आणू नये.याचे भान आम्ही बाळगलं होतं.बाळगत आहोत. परंतु या मुद्यावर फेसबुक पेटले होते.सदर अजाण मुलीला निळी रांड म्हणण्यापर्यंत मजल गेली.यात अशा पोस्ट लाईक करणाऱ्या चक्क "घरंदाज"वगैरे मिरवणाऱ्या स्त्रिया देखील होत्या हे पाहून अतोनात यातना झाल्या होत्या ती पोस्ट स्क्रीनशॉट मी इथे दिले होते.एवढे होऊनही याच लोकांनी एट्रोसिटी कायदा बदनाम करण्यासाठी बनावट कहाण्या रचून आंबेडकरी समाज बदनाम करण्याचे धोरण ठेवले. मराठा क्रांती मोर्च्या संदर्भात सामानातून अपमानजनक खिल्ली उडवली गेली.फेसबुक पेटले नाही.छिदमने तर टोकच गाठले पण यांच्याकडून तसा संताप दिसला नाही जो इतरवेळी दिसतो.अन कालच संभाजीब्रिगेडच्या अन मराठा क्रांती मोर्च्याच्या पुणे संघटक पदी असणाऱ्या शरद पोखरकर यांना शिवरायांचा विचार सांगणारी पुस्तके वाटली म्हणून जबर मारहाण केली आहे.पण ज्यांनी त्यावेळी आंबेडकरी समाजाच्या विरोधात रान पेटवले होते. त्यांनी याचा साधा निषेध देखील केला नाही.एका महाभागाने तर बातमी सांगावी तसे सांगून वेळ मारून नेली.मला आश्चर्य वाटलं.हेच जर इतर कुणाकडून झालं असतं तर इथं दंगली पेटवल्या असत्या. भीमा-कोरेगांव दगडफेक झाली तेव्हाही यातील काही लोक भिडे-एकबोटेला वाचवताना दिसले.

ही अशी दुटप्पी भूमिका पाहून यांची पक्ष अन जात निष्ठा प्रकर्षाने ठळक होतेच पण इतरांविषयी किती द्वेष ठासून भरला आहे हेही स्पष्ट होते.जय शिवाजी जय भवानी म्हणत काल भीमनगरवर दगडफेक झाली.गाड्यांचे नुकसान झालं.सेम मोडसऑपरेंडी भीमा-कोरेगांवची.विशेष म्हणजे भीमनगरमध्ये शिवजयंतीच साजरी होत होती.जातीचा माज अन इतरांविषयी विषाक्त द्वेष एवढा भयानक आहे की आज शिवाजी असते तर त्यांनाही या लोकांनी सुनावलं असतं.असेही शिवाजीना स्वकीयांनीच जास्त त्रास दिलेला.आजही तीच पिलावळ नाव खराब करत हिंडते.कालच्या घटनेवर सगळ्यांनी तोंड शिवले आहे.हाताला लकवा मारला आहे.आंबेडकरी समाजाने कधीही कुणाच्या सण उत्सवावर दगडफेक केल्याचा इतिहास नाही.
पण हे एवढे नीच आहेत की शिवजयंती असली तरी त्यावरही दगडफेक करून आपली मर्दानगी गाजवणार.अर्थात पार्श्वभागात दम तसा कुणाच्याच नाही हे लांडगे झुंडीने येतात.हे षंढ कधीच समोरून लढले नाहीत. कुणातरी म्हाताऱ्याच्या नादी लागून गरिबांना त्रास देत त्यांच्यावर अत्याचार करत रहायचं हाच यांच्याठायी शिवविचार उरलेला दिसत आहे.यात यांनी आपले जात-बांधवही सोडले नाहीत.त्यालाही बेदम मारहाण. नेमकं कुठे चाललाय हा समाज मला याचीच जास्त काळजी आहे.कारण शेवटी मरण गरीबांचेच असते. यासाठी समाजात विचारवंतांची नितांत गरज असते.नाहीतर समाज गुंड आणि गंड जपणारा म्हणूनच इतिहासात नोंदला जातो.त्यामुळे प्रबोधन हे सर्वांच्याच हिताचं आहे. - मिलिंद धुमाळे

बुधवार, ३१ जानेवारी, २०१८

एससी एसटी क्षमस्व

विवाहोत्सुक मुलगा - हॅलो..(?)
विवाहोत्सुक मुलगी - हं बोला..(?)
विवाहोत्सुक मुलगा - मी चिन्मय बोलतोय मुंबैतून
विवाहोत्सुक मुलगी - कोण हवंय ?
विवाहोत्सुक मुलगा - सुकन्या बोलताय का?
विवाहोत्सुक मुलगी - हो बोलत्यीये...(?)
विवाहोत्सुक मुलगा - तुम्ही जाहिरात दिलेली वाचली लग्नासाठीची (?)
विवाहोत्सुक मुलगी - हम्म..अच्छा..बोला नं....
विवाहोत्सुक मुलगा - जाहिरातीत वर्णन असलेल्या तुम्हीच का त्या? म्हणजे तुमच्यासाठीच दिलेलीत का?
(जाहिरात जन्म 1976 रा.पुणे (महाराष्ट्र) शिक्षण:- बी.ई.(इले.)
व्यवसाय/नोकरी:- नोकरी मासिक उत्पन्न: - 50 हजार उंची:- 5' 2''. वर्ण:- गोरा वजन:- 60 कि. आई / वडिल- नोकरी/ भाऊ- नाही / बहिणी:- तीन पत्रिकाविषयक अटी:- पत्रिका पाहणार, मंगळ नाही जन्मरास-मेष /
अपेक्षा:- डॉक्टर/इंजिनिअर हवा, परदेशी जाण्याची तयारी, गावाची अट नाही.शक्यतो मुंबई, पुणे राहणारा. एकुलता एक असल्यास प्राधान्य.
जातीची अट नाही (एससी एसटी क्षमस्व)
विवाहोत्सुक मुलगी - होय..माझ्या डॅडनी दिलेली
विवाहोत्सुक मुलगा - अच्छा.. मी चिन्मय,इंजिनिअर आहे रहायला मुंबै,खाजगी कंपनीत जॉब करतो.14 लाख वार्षिक पेकेज आहे.
विवाहोत्सुक मुलगी - छानच की..घरी कोण कोण असतं?
विवाहोत्सुक मुलगी - आई आणि मी दोघेच
विवाहोत्सुक मुलगी -गुडच हे म्हणजे...छान गाव कोणतं म्हणालात ?
विवाहोत्सुक मुलगा - अहो मी अजून ते सांगितलंच नाहीये..(?)
विवाहोत्सुक मुलगी - हम्म..मग सांगा ना? तेच तर विचारत्यीये
विवाहोत्सुक मुलगा - विदर्भातला आहे मी...तुम्ही गावाची अट नाही असे लिहिले आहे ..(?)
विवाहोत्सुक मुलगी - हो हो अगदी...चालेल की...पण रहायला मुंबैच ना?
विवाहोत्सुक मुलगा - होय..तुमचे वय खरे आहे काय? म्हणजे जन्मतारीख दिली आहे ती खरी आहे?
विवाहोत्सुक मुलगी - इश्श खरीच देणार नं...पण तेवढ्या वयाची दिसत नाही हं मी..अगदीच..
२५ वर्षाची वाटते मी असं माझ्या मैत्रिणी म्हणतात..युनो..मी योगा वगैरे करते नियमित अन टोटल वेगन आहे म्हटलं..
विवाहोत्सुक मुलगा - अरे वा छान आहे .. मी चाळीसचा आहे तेवढाच वाटतो..दोन वर्षे मोठ्या आहात तरी चालेल मला.आजकाल कोण बघत नाही या गोष्टी यु नो सचिनची बायको तर तीन वर्षे मोठी आहे म्हणे..
विवाहोत्सुक मुलगी - होय..छान विचार आहेत हो तुमचे आय लाईक इट..मुंबैत स्वत:चे घर असेल ना?
विवाहोत्सुक मुलगा - हो आहे की मोठ्ठा 2 बीएचके flat आहे स्वत:चा अन तेही दादर भागात.
विवाहोत्सुक मुलगी - छानच की...तीथे चौपटी जवळच आहे म्हणतात मला खूप आवडते समुद्रावर जायला.वाळूत नावे लिहायला.वाळूचा बंगला बनवायला..कित्ती गोड मजाच येईल..
विवाहोत्सुक मुलगा - तुम्ही आलात तर रोज घेऊन जाईन चौपाटीवर फिरायला
विवाहोत्सुक मुलगी - अय्या कित्ती छान...मग कधी येताय मला बघायला..आयमिन आमच्या डॅडशी बोलणी करायला?
विवाहोत्सुक मुलगा - येतो की,सुट्टी टाकून रविवार वगैरे गाठून चालेल...ना?
विवाहोत्सुक मुलगी - हो हो अगदी..चालेल की..मलाही रविवारी सुट्टीच असते बाबाही घरीच असतात..म्हणजे सकाळी कमिटी शाखा वगैरे आटपून अकरा प्रयत्न येतातच ते ..तुम्ही आडनाव नाही सांगितलेत ?
विवाहोत्सुक मुलगा - आडनाव कशाला आता? ओके तरीही सांगतो हसू नका पण...ठोकेवाले
विवाहोत्सुक मुलगी - इश्श हे काय आडनाव आहे?
विवाहोत्सुक मुलगा - अहो आमचे पूर्वज इंग्रजांच्या काळात चर्चच्या घंटा वाजवायचे लाकडी दांड्याने ठोके देवून तेव्हापासून हे आडनाव रूढ झालेय आम्हाला..एकदा झोपून गेल्यामुळे घंटा वाजवायची राहून गेली..अन आमचा पगार कापल्या गेला.त्याचा राग येवून आम्ही तीच घंटा अशी काही वाजवली की इंग्रज थरथर कापू लागले..त्यांचे कान किटून गेले..देशात स्वातंत्र्याचे रणशिंग फुंकले गेले अवघी धरणी स्वातंत्र्याच्या ओढीने तेजाळून निघाली.आम्ही पण स्वातंत्र्यवीर आहोत.काय समजलांत..?
विवाहोत्सुक मुलगी - पण मला नाही आवडलं हे तुमचं आडनाव...मी माझेच ठेवणार कायम..चालेल का?
विवाहोत्सुक मुलगा - जाहिरातीत ही अट नव्हती पण ठीक आहे आजकाल काय स्त्रीवाद बराच फोफावला आहे.मीही त्यात सामील होतो मग..चला घेऊ हेही जुळवून..
विवाहोत्सुक मुलगी - वाह किती सुंदर विचार..असं वाटतं लग्न करून आताच यावं तुमच्याकडे ..बाय द वे तुमची कास्ट काय आहे हो?
विवाहोत्सुक मुलगा - आमची कास्ट ग्रेट आहे.पण तुम्हाला कास्टशी संसार करायचा आहे की अनुरूप जोडीदाराशी? तुमचं वय बघा आतापर्यंत व्हायला हवं होतं ना...?
विवाहोत्सुक मुलगी - अजिबात चालणार नाही...करीन तर जातवालाच नाहीतर करणारच नाही आयुष्यभर तशीच राहीन..
विवाहोत्सुक मुलगा - जाहिरातीत जातीची अट नाही असं लिहिलं होतं तुम्ही..?
विवाहोत्सुक मुलगी - होय परंतु कंस वाचला नाहीत का? तुम्ही कोण आहात सांगा बरे...?
विवाहोत्सुक मुलगा - अच्छा तर मी त्यातच मोडतो असे समजा हवे तर...
विवाहोत्सुक मुलगी - वाह एका उपवर मुलीला दगा देण्याचा प्रयत्न केलात फसविण्याचा प्रयत्न केलात..तिच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न केलात..एवढा वेळ गुलगुलू करत होतात मग...? दुष्ट निर्दयी...असेच असतात तुम्ही लोक..
विवाहोत्सुक मुलगा -अहो लग्न जोडीदाराशी/माणसाशी करायचं असतं त्याच्या जातीशी नाही.आणि गाडी लेट होती हातात लोकसत्ताची जाहिरात पाहिली म्हटले चला टाईमपास करू म्हणून केला फोन सॉरी हा...ठेवतो..बाय
विवाहोत्सुक मुलगी - xxxxxxxxx

मंगळवार, ३० जानेवारी, २०१८

डुक्कर आणि आपली मनस्थिती

डुक्कर विनाकरण ढुशा देतं तुम्हाला धडक देवून पळून जातं
तुम्ही त्याला धडा शिकवायला मागे धावता,
डुक्कर बाजूच्या गटारात लोळून सर्वांग माखून घेतं
तुम्ही थबकता,मग डुक्कर तुम्हाला आव्हान देतं..
ललकारत म्हणतं... दम असेलतर भीड आता...
तुम्ही त्याच्यासोबत चिखलात माखून घेणार नाही.तुमचे कपडे खराब होणार असतात वेळ व्यर्थ जाणार असतो यातून काहीच हाती लागणार नसतं त्यामुळे तुम्ही दुर्लक्ष करता-
डुक्कर 56 इंची छाती फुगवून... जिss तम जिsss तम म्हणत असते.
चिखलात लोळणे डुकराचा स्वभाव आहे तुमचा नाही.
शांत रहा.तुम्ही त्याच्यासोबत लोळून कपडे खराब केले नाहीत याचे स्वत:साठी आभार माना.मानसिक समाधान मिळेल.

शुक्रवार, २६ जानेवारी, २०१८

26 जानेवारी प्रजासत्ताक दिन

15 ऑगस्टपेक्षा 26 जानेवारी हा प्रत्येक भारतीयासाठी महत्वाचा दिवस आहे.
15 ऑगस्टला कमी लेखण्याचा प्रश्नच नाहीये.पण तोही आता "इतिहासच" झालेला आहे.आणि आपल्याकडे एक अशी फॅशन रुजवली जात आहे की गतइतिहासाबद्दल ब्र काढू नये.
दुसरा मुद्दा आहे 15 ऑगस्टला आपण फारतर झेंडा फडकावतो स्वातंत्र्यसैनिकाना याद करतो त्यांचे कौतुक आहेच.परंतु दुसऱ्या महायुद्धात आपण भारतीय ब्रिटीशांच्या सैन्यात होतो आणि जपानच्या विरोधात लढत होतो.
होय तेच जपान ज्याच्याकडून आपण बुलेट ट्रेनची भीक घेणार आहोत.जपान ते देणारच आपल्या नाकावर टिच्चून.ब्रिटीशांच्या दफ्तरी कोणत्या समाजाचे कारकून अधिकारी होते कोण कोण ब्रिटीशांची पेन्शन खात होते.
ते तपासले तर काहीना तोंड लपवून फिरावे लागेल.तेच लोक अमुक तमुक इंग्रजांच्या बाजूने लढले असा अपूर्ण आणि खोडसाळ इतिहास मांडून इथे जातीत भांडणे लावून फोडा-झोडा ही नीती वापरून पुन्हा या देशावर आपली निरंकुश सत्ता असावी याची तोडजोड करत आहेत.
यासोबत करणी सेना सारख्या नवीनच अतिरेकी संघटना जन्माला घालून भविष्यात देशात अराजक माजवण्याची तजवीज करून ठेवत आहेत.याचा ट्रेलर आपण आज पाहिलेला आहेच.जेव्हा देश जळत होता.तेव्हा देशाचे नेतृत्व करणारे जबाबदार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे स्वित्झर्लंड मध्ये बर्फात फोटोग्राफी करण्यात मग्न होते.हे इतिहासात नोंदवले जाईलच.
याचसोबत म्हणून आपण लक्षात घेतले पाहिजे की 26 जानेवारी हा प्रत्येक भारतीयासाठी महत्वाचा दिवस का आहे?
26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिवस म्हणून आपण साजरा करत आलो आहोत.प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता.तेव्हा यास खरेतर लोकसत्ताक असा योग्य शब्द योजणे सुरु केले पाहिजे.सुरुवात इथून करूया.
याचा व्यापक अर्थ जरा नीट समजून घेऊया.घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि अर्थातच त्यावेळचे सर्वच नेते ज्यांनी ज्यांनी घटनेला मान्यता दिली ती अंमलात आणण्यासाठी होकार दिला त्या सर्वांचे अगोदर आभार मानले पाहिजेत.तत्कालीन प्रधानमंत्री पंडीत जवाहरलाल नेहरू यांचे काहीही किंतु परंतु मनात न ठेवता आभार मानूया.
त्यावेळी या सर्वानीच लोकांच्या बाजूने निर्णय घेतला.स्वार्थ ठेवला नाही.त्यावेळची ही माणसे वेगळी होती.यात काही अपवाद आहेत ते बाजूला ठेवा.परंतु ज्यांनी ही अमुल्य भेट देश बांधवाना दिली त्या सर्वांचेच मनाच्या अंतकरणातून आभार मानले पाहिजेत.मी या मताचा आहे.आणि आज आपली जबाबदारी जास्त वाढली आहे.
वर म्हणल्याप्रमाणे ही लोकांची सत्ता आहे.लोकांनी लोकांसाठी लोकांच्या कल्याणाकरता चालवलेलं गणराज्य खरेतर किती सुंदर आणि उदात्त विचार आहे हा.आणि त्याबरहुकूम जर आपली घटना राबवली आपण तसे वागलो तर या जगाच्या पाठीवर आपल्या देशाशी बरोबरी करणारा देखील कोणताच देश उरणार नाही.एवढे मोठे तत्वज्ञान आपल्या राज्यघटनेत सामावलेले आहे.गरज आहे ते प्रामाणिकपणे राबविण्याची.
म्हणून 26 जानेवारी हा प्रत्येक भारतीयासाठी फार महत्वाचा दिवस आहे.
यासाठी संविधान वाचविणे ते योग्यप्रकारे राबविणे याची दक्षता प्रत्येक जात-धर्मातील लोकशाहीप्रेमी नागरिकाने घेतली पाहिजे.
तुमचे हक्क,तुमचा नकार देण्याचा,आवाज उठवण्याचा,विरोध करण्याचा,लिहिण्याचा बोलण्याचा हक्क आणि स्वातंत्र्य तुम्हाला केवळ आणि केवळ हे संविधानच देते बाकी कुणीही नाही.उद्या जर तेच नसेल तर काय होईल याचा विचारच न केलेला बरा.कारण-
आज आपण सत्ताधारी भाजपने देशात जो काही धुमाकूळ घातला ते आपण सर्वांनी उघडपणे पाहिले त्यांच्या एका नेत्याचे कबुलीजबाब देखील पाहिले.यातून आपण बोध घेऊया अशा धर्माध शक्तींना आपल्या देशात थारा देता कामानये सत्ता देता कामा नये.
लक्षात ठेवा देशात यापुढे कधीही कुठेही दंगा सुरु होऊ शकतो.आपले प्रिय मुले-मुली नातेवाईक मित्र रस्त्यात कुठेही कधीही अशा हिंसक घटनांचे बळी जाऊं शकतात.याची खात्री बाळगा.अशा अप्रिय घटना घडू नये म्हणून वाईट गोष्टीना आपण थारा दिला नाही पाहिजे,
मंदिराने आपल्या आयुष्यातला प्रश्न सुटणार नाही.इतिहासातील पात्रे पुतळे स्मारके यांनी आपला प्रश्न सुटणार नाही.ना प्रगती होणार आहे.
ही खुणगाठ मनाशी पक्की करून ठेवा.लोकांची सत्ता अबाधित राखायची असेल तर जात-धर्मीय राजकारण करणाऱ्या पक्षाला निवडून न देता जनतेचे मुलभूत प्रश्न सोडविणाऱ्या पक्षांना मतदान केले पाहिजे हेच खरे लोकसत्ताक व्यवस्थेचे भान आणि कर्तव्य आहे.
जात-धर्म-वेश-भाषा-संस्कृती विविधतेने नटलेल्या सर्वांगसुंदर देशातील तमाम नागरिकांना त्यांचे हक्क अधिकार अभिव्यक्त होण्याचं निपक्ष स्वातंत्र्य बहाल करणारं संविधान !!
तुम्हाला तुमच्या कुटुंबीयांना मित्रांना सर्वांना
हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांचे मंगल हो !!
प्रजासत्ताक अन त्याचा दस्तावेज संविधान चिरायू होवो
जयभीम जय भारत जय संविधान !!

रविवार, २१ जानेवारी, २०१८

मि. मेवाणी ‘डेंजर झोन’ अहेड!

राजकारणात जितकी समीकरणं महत्त्वाची, तितकाच संयमही महत्त्वाचा असतो. त्याच सोबत असावी लागते मुत्सेद््गिरी. तगडा जनसंपर्क अन् उपद्रवमूल्य कायम राखण्याच्या भानाची. यातील काही गोष्टी राजकारणात सरावाने आत्मसात करता येतील मात्र संयम आणि मुत्सेद््गिरी अंगभूत असणे गरजेचे असते.

अलीकडेच झालेल्या गुजरात निवडणुकीत बलाढ्य मोदी-शहा जोडीला कडवं आव्हान देत राज्यातल्या दलित समुहाचा चेहरा आणि आवाज बनू पाहणाऱ्या आमदार जिग्नेश मेवाणींच्या संदर्भात विचार करताना, त्यांच्याबाबतीत समिकरणं तर चांगलीच जुळून आलीय, परंतु त्यांच्याकडे संयम नाहीये का, असा प्रश्न अलीकडच्या आक्रमक राजकारणामुळे पडू लागलेला आहे.

ते अल्पावधीतच स्वत:चं ‘पॅन इंडियन’ नेतृत्व प्रस्थापित करू पाहत असल्याचंही जाणवत आहे. महाराष्ट्रात भीमा-कोरेगावच्या पार्श्वभूमीवरची त्यांची सभा, दिल्लीतली मोदी सरकार विरोधातली ‘हुंकार रॅली’ ही त्यांच्यातली अधीरता स्पष्ट करणारी आहेत असे निरीक्षण नोंदवावे लागेल.दीर्घकालीन राजकारण करायचे असेल तर प्रतिस्पर्ध्यांना डिवचण्यापेक्षा आपला मतदार संघ अधिकाधिक मजूबत करणे, त्यासोबत कार्यकर्त्यांची फळी निर्माण करणे गरजेचे आहे.

जिग्नेश मेवानी यांची राजकीय पार्श्वभूमी विचारात घेता, अगोदर ते आम आदमी पार्टीत होते. उना येथे हिंदू-गोरक्षकांकडून हिंदू-दलित तरुणांना झालेल्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्ह मेवानी यांनी संघर्ष सुरू केला. तेव्हा भाजमधील काही लोकांनी आम आदमी पार्टीला टार्गेट करत, या प्रकरणाला राजकीय वळण देत मेवाणींची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनाला कोणत्याही प्रकारे हानी पोहचू नये म्हणून त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आणि स्वतंत्रपणे राज्यव्यापी आंदोलन उभारले, जे देशभरात चर्चेचा विषय ठरले.

गुजरात इलेक्शनमध्ये जिग्नेश यांची पक्ष सोडल्यानंतरही ‘आप’ने मदत केली. कारण दोघांचा मुख्य विरोधक हा भाजप पक्ष असल्यामुळे, आम आदमी पार्टीने तिथे उमेदवार उभा केला नाही. पक्षाचे अध्यक्ष तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी ट्विटरवरून जिग्नेश यांना शुभेच्छा दिल्या. गुजरातमधील वडगाममध्ये झालेल्या सर्वपक्षीय विरोधकांच्या सहमतीमुळे जिग्नेश तिथे निवडून जाऊ शकले. ही वस्तुस्थिती आहे. त्यानंतर त्यांची पहिली जाहीर सभा महाराष्ट्रातील पुण्यात झाली.

भीमा-कोरेगावच्या पार्श्वभूमीवर झालेल्या सभेत त्यांच्यावर प्रक्षोभक भाषणांचे आरोप होत आहेत, ते बालीश अन् निराधार आहेत, ही वस्तुस्थिती असली तरीही महाराष्ट्रातील किंवा इतर राज्यातील आयोजकांनी एक काळजी घेतली पाहिजे. ती म्हणजे, प्रत्येक राज्याची एक श्रवण संस्कृती आहे. शाब्दिक चकमकी झेलण्याची ताकद आहे. भारताचा विचार करू जाता, इथे भडक स्वरूपाची भाषणे देणारे जवळपास सर्वपक्षीय नेते आहेत, हे ही खरे आहे. परंतु ते आपापल्या राज्यात भाषणे देत असतात. महाराष्ट्राला जहाल भाषणांची परंपरा आहे. धर्मांची आणि व्यक्तिविशेष नावे घेऊन इथे अगदी पातळीसोडून शाब्दिक हल्ले भाषणांमधून झालेले महाराष्ट्र पहात ऐकत आलेला आहे. परंतु अशा चकमकी करणारा परराज्यातील असेल, तर लोकांची मानसिकता ही अगोदरच टोकदार अन् विरोधात उभी ठाकलेली असते. अशावेळी आपला तो ‘बाबू’ दुसऱ्याच ते ‘कार्ट’ अशी मानसिकता नेत्यांच्या बाबतही खरी ठरते, ती जिग्नेश मेवाणींच्या बाबतही तशी ठरली आहे. पुण्यातील भाषणात त्यांनी नरेंद्र मोदींवर थेट हल्ले केले आहेत.

आमदारकीच्या पहिल्याच प्रयत्नात लहान तोंडी मोठा घास घेण्याचा त्यांचा अट्टाहास अंगलट येण्याची शक्यता आहे का? एक उभारता राजकीय नेता म्हणून हा प्रश्न गांभीर्याने पाहणे अगत्याचे ठरते. मोदी बॅशिंग किंवा मोदी विरोध’ या व्यक्तीकेंद्री कार्यक्रमावर त्यांना यशस्वी राजकारण करणे शक्य आहे का? की भाजपचे एकूण बहुजनविरोधी राजकारण शेतकऱ्यांचे प्रश्न बेरोजगार युवकांचे प्रश्न उद्योगधंद्यातील मंदी महागाईने होरपळलेली जनता शिक्षणक्षेत्र आंबेडकरी व इतर मागास समूहांचे शोषण इत्यादी ठळक फेल्यूर झालेले मुद्दे घेऊन भाजपला घेरता येईल? याचा विचार झाला पाहिजे.

कारण अलीकडील त्यांच्या भाषणात ते कायम मोदींना लक्ष्य करताना दिसून येत आहेत.वरील ढोबळ राजकीय मुद्दे विचारात घेत असताना, आंबेडकरी समूहात जी एक उत्साहाची लाट आली आहे, ती मागे सारून डोळसपणे विचार व्हावयास हवा. कारण, आंबेडकरी समूह जिग्नेश मेवानीमध्ये नेतृत्व शोधत असेल, तर त्याअगोदर त्यांनी थोडे थांबले पाहिजे. जिग्नेश यांना इथला सोशलफॅब्रिक समजून घ्यायला वेळ लागणार आहे. धर्मांतराने प्रश्न सुटणार नाहीत, असे मेवानी यांनी एका मुलाखतीत म्हटलेले आहे. हे अतिशय बाळबोध अन् अपेक्षाभंग करणारे वक्तव्य आहे. आजचा आंबेडकरी समूह ज्याप्रमाणे समाजाच्या मुख्यप्रवाहात धडका देत मुसंडी मारतो आहे. तुलनेत ज्यांनी धर्मांतर केलेलं नाही, ते मागास समूह आजही चाचपडताना दिसत आहेत.

एकाच वेळी मार्क्स लेनिन अन् आंबेडकरी तत्वज्ञान त्यासोबत भगतसिंग यांचे विचार, अशा वैचारिक चक्रव्यूहात जिग्नेश सापडल्याची शक्यता आहे. यासाठी विचारांची बैठक पक्की असणे गरजेचे आहे. त्यानुसार भविष्यात समविचारी म्हणून काही विचारी प्रवाह आपणास सोबत घेता येतीलही.
परंतु त्यांचे कोलॅबरेशन करत नवीनच काहीतरी उभे करताना त्रेधा उडणार आहे, याची काळजी संबंधितांनी घेणे गरजेचे आहे.

आजच्या भारतीय राजकारणाच्या परिप्रेक्षात उमर खालिद, शहेला रशिद, कन्हैयाकुमार यासारख्या विद्यार्थी नेत्यांचे उपद्रवमूल्य बेरजेच्या राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत नगण्य आहे. ते काहीही करिष्मा करू शकत नाहीत, हे वास्तव सर्वानीच स्वीकारले पाहिजे.

वरील मंडळी जे तत्वज्ञान मांडू पाहतात, ते अशा लोकांसाठी योग्य असते, जे विद्यापीठीय अभ्यासक आहेत. त्यांच्या भूमिकांचे सूक्ष्म कंगोरे ते समजून घेण्याची कुवत बाळगतात.इथल्या सामान्य जनतेत ती कुवत नाही. याचाच फायदा घेऊन या जेएनयूच्या विद्यार्थी नेत्यांना विरोधकांनी फुटीरतावादी राष्ट्रविरोधी म्हणून लोकांच्या मनावर बिंबवण्यात काही प्रमाणात यश मिळवलेले आहे. त्यामुळे त्यांनी त्यांचे योगदान त्याच परिघात सीमित ठेवणे योग्य राहील. सध्याच्या काळात त्यांच्याबरोबर वावरण्याची मेवानीची खेळी प्रगल्भ राजकारणाचे लक्षण मानता येईल, असे वाटत नाही. त्यांचा हा मार्ग राजकीयदृष्ट्या विघातक ठरू शकतो. नवतरुण मतदारांना अपेक्षित विधायक राजकारणाची चाहुल त्यांच्या कृतीत वा वक्तव्यांत मिळत नाही. तर या तिघांप्रमाणे त्याच विद्यापीठीय राजकारणाचा ते नकळतपणे एक भाग होऊ लागले आहेत काय? अशी चिंतायुक्त भीतीही वाटते. स्वत:चे नेतृत्व उभारायचे असेल तर त्यांनी संयमाने दीर्घकालीन राजकारण करण्याच्या दृष्टीने पाऊले उचलली पाहिजेत. मुत्सेद््गिरी दाखवली पाहिजे. वरील मुद्यांच्या विचार करता ‘जिग्नेश मेवाणी स्वत:हून राजकीयदृष्ट्या अपघातप्रवण क्षेत्रात प्रवेश करताहेत का? हा प्रश्न इथे म्हणूनच कळीचा ठरतो आहे.
पूर्वप्रकाशित दैनिक दिव्यामराठी Jan 21,2018  

Translate