शुक्रवार, १३ ऑक्टोबर, २०१७

हिंदूंच्या सणांवरच बंदी का?


आपल्या देशात जशी विविधतता आहे.त्याचप्रमाणे विविध सणांची रेलचेल देखील आहे.मनुष्य हा उत्सवप्रिय प्राणी आहे. दोन लोक एकत्र जमले की त्या क्षणांमधून आनंद साजरा करण्याची प्रथा सुरु झाली.त्यास सामूहिकता लागू झाल्यावर अमूक दिवशी तमूक सण उत्सव साजरा करण्याच्या पूर्वपार प्रथेला सामाजिक अधिष्ठान प्राप्त झाले.
भारतात ढोबळमानाने हिंदूंची संख्या जास्त आहे.असे मानले जाते.

इथे कळीचा मुद्दा असा की मुळात हिंदू कोण?
हिंदू धर्मात जातीय विषमता असल्यामुळे आणि प्रत्येक जात दुसऱ्या जातीला नीच व कमी प्रतिष्ठेची आणि काही जाती स्वतःला इतरांपेक्षा उच्च आणि अतिप्रतिष्ठीत मानीत असल्यामुळे हे सर्व एकाच धर्मातील आहेत एकच आहेत हे मानणे शुद्ध मूर्खपणा ठरतो त्यामुळे कुणाकुणाला हिंदू या संज्ञेत बसवायचे याचा सर्वमान्य नियम नाही.नियम बनला तर हिंदू अल्पसंख्य ठरतील अशी परिस्थिती उद्भवू शकते त्यामुळे विविध जाती पंथ इत्यादी अशा सर्वच समुहांचे सरसकटीकरण हिंदू करण्यात राजकीय आणि धार्मिक दृष्ट्या जास्त फायद्याचे असते.यात धर्माच्या ठेकेदारांपेक्षा राजकीय धार्मिक ठेकेदार अशा सोयीचा पुरेपूर फायदा घेत आले आहेत.जसजसे समाज विकसित होऊ लागला त्याचे आधुनिकीकरण होऊ लागले तसे तसे समजात साजरे होणाऱ्या उत्सवसणांचे स्वरूप बदलू लागले.लोकसंख्या प्रचंड प्रमाणात वाढली तसे सामूहिकपणे सण साजरे करण्याची व्यापकता वाढली.

अर्थातच यामुळे प्रचंड प्रदूषण निर्माण होऊ लागले.मग ते ध्वनिप्रदूषण असो वायू प्रदूषण जल प्रदूषण प्लास्टिक प्रदूषण असो कि सामाजिक प्रदूषण हे स्वाभाविक आहे.ही सर्वच प्रदूषणे ही मानवनिर्मित आहेत.अन त्यामुळे पर्यावरणाची हानी होतेच त्यासोबत मानवी आरोग्यावरही त्याचा दुष्परिणाम होतो आहे.हा धोका ओळखून समाजातील काही संवेदनशील समाजसुधारकांनी या प्रदूषणाच्या विरोधात आवाज उठवायला सुरुवात केली.समाजात विविध स्तरावर जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला.इथे एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की जर इथे ज्याप्रमाणे आपण म्हणतो की इथे अमूक धर्मीय लोकांची संख्या जास्त आहे.त्याप्रमाणे त्या अमूक लोकांकडून सामूहिकरीत्या साजरे होणाऱ्या उत्सव सणांची व्यापकता आणि सामूहिकरीत्या केल्या जाणाऱ्या उत्सव सणांच्या माध्यमातून निर्माण होणारे प्रदूषण आणि त्याचे दुष्परिणाम हे इतर धर्मीयांच्या तुलनेत जास्तच असणार हे नैसर्गिकच ठरते.

समजा इथे हिंदू धर्मियांच्या ठिकाणी आपण जर मुस्लीम शीख ख्रिस्ती बौद्ध इत्यादी धर्म ठेवले आणि त्या लोकांनी अशाच प्रकारे सणउत्सव साजरे केले तर तेव्हाही हीच परिस्थिती उद्भवू शकली असती.किंबहुना या धर्मियांच्याकडून साजरे केल्या जाणाऱ्या सण उत्सवातूनही प्रदूषण हे होतच असते.फक्त फरक असा की तुलनेत यांची संख्या कमी असल्यामुळे उपद्रवमूल्य कमी प्रमाणात दिसते.शिवाय हिंदू आणि इतर धर्मियांच्या सणांची तुलना केल्यास हिंदू धर्मात सर्वात जास्त सणउत्सव आहेत आणि ते मोठ्याप्रमाणात साजरे केले जात आहेत असे आढळून येते.त्यामुळे केवळ हिंदूंच्या सणांवरच बंदी का? असा प्रश्न पडणे किंवा तशी भावना निर्माण होणे गैर आहे.अप्रस्तुत आहे.राजकीय नेते जेव्हा अशी मखलाशी करतात तेव्हा ते धर्माच्या आड राजकारण करतात हे स्पष्ट होते.

दुसरा मुद्दा महत्वाचा असा की भारतातील समाजाने स्वतःमध्ये काळानुरूप अनेक बदल केले आहेत.आणि जसजसे जग बदलत आहे तसतसे भारतीय समाजही स्वतःमध्ये बदल करत जातो आहे.त्यामुळेच तो सामाजिक धार्मिक सुधारणांसाठी आग्रही असलेला दिसतो.अर्थात यात अपवाद आहेतच आणि त्यातही राजकारण करणारे अपवाद जास्त असल्यामुळे तसेच त्यांचे उपद्रवमूल्यही भरमसाठ असल्यामुळे अशावेळी भारतीय सुधारणावादी नागरिक संभ्रमात पडलेला दिसतो.आपले नेमके कशात आहे हे त्यास ठरवता येत नाही.याचमुळे धार्मिक अस्मिता की सामाजिक आरोग्य सुधारणा या पेचात तो अडकलेला दिसतो.सामाजिक धार्मिक सुधारणा होऊ न देणे आणि त्यात आपली राजकीय पोळी भाजून घेणे हे राजकीय धार्मिक ठेकेदारांचे पूर्वापार चालत आलेले षड्यंत्र आहे.त्यामुळे आजकाल न्यायालयांनी दिलेल्या निर्णयांच्या विरोधात उघडपणे नाराजी नापसंती आणि विरोध प्रकट करण्याचे प्रकार वाढले आहेत.

मुळात आपण एक नीट लक्षात घेतले पाहिजे की भारतीय न्यायालये धार्मिक गोष्टीत हस्तक्षेप करत नाहीत.न्यायालय नागरिकांचे मुलभूत अधिकार स्वातंत्र्य सामाजिक आरोग्य यासाठी कटिबद्ध आहे.आजवर आपण न्यायालयांचे निर्णय पाहिले तर त्यांनी कोणत्याही धार्मिक उत्सवसणांवर बंदी आणलेली नाही.स्पेसिफिकली दिवाळीबाबत बोलायचं तर दिवाळी साजरी करू नका असे न्यायालयाने कधीच म्हणलेले नाही ना तसा निर्णय दिला ना तसा तो देण्याचा त्यांचा अधिकार आहे.

ज्या ज्या गोष्टी मानवी आरोग्यास हानीकारक आहेत.सामाजिकदृष्ट्या अहितकारक आहेत.त्याच संबंधी निर्णय न्यायालयात दिले जातात.आणि यातही मुख्य मुद्दा असा की जोपर्यंत कुणी नागरिक न्यालयात जाऊन त्यासंबंधी दाद मागत नाही,तोपर्यंत न्यायालाय स्वतःहून हस्तक्षेप करून कोणताही निर्णय देत नाही.मुद्दा दिवाळीचाच असेल तर फटाके बंदीसाठी न्यायालयात जाणारे हे हिंदू धर्मीय बांधवच आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.त्यामुळे आपल्या धर्माविरुद्ध इतर कुणीतरी इतर धर्मियांनी कारस्थान केले वगैरे संशय घेण्यात अर्थ नाही.शिवाय फटाके केवळ दिवाळीतच वाजवले जातात अशातला भाग नाही.तर वर्षाचे ३६५ दिवस आपल्याकडे काही ना काही सुरु असते.

यात गंमतीचा भाग असा की फटाक्यांचा शोध सातव्या शतकात चीनने लावला.ज्या देशातील वस्तूमालांवर आपण बहिष्कार टाकण्याच्या गप्पागोष्टी करतो.जो देश आपल्या देशाविरुद्ध खुसपटे काढत असतो.पाकिस्तानच्या सतत बाजूने उभा असतो अशा देशाने लावलेल्या शोधातून आपण आपला आनंद शोधणे,व्यक्त करणे हे देशप्रेमी नागरिकांसाठी कितपत योग्य आहे? हा प्रश्न आपणच आपल्याला विचारला पाहिजे.

कोणताही सणउत्सव साजरा करत असताना आपल्या प्रियजनांना इजा दुखापत होऊ नये असे प्रत्येकालाच वाटत असते.आनंदाच्या दिवशी अघटीत घडू नये अशीच सर्वांची भावना असेल.त्यामुळे अपघाताचे साधन आनंद व्यक्त करण्यासाठी उपयोगात आणने योग्य आहे काय? याचाही एकदा विचार व्हावा.




-   मिलिंद धुमाळे       
  १३-१०-२०१७ 

Translate