मंगळवार, १२ डिसेंबर, २०१७

तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे

तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे
तुफान वारा ,पाऊस धारा मुळी न आम्हा शिवे
जेष्ठ कवी गीतकार वामनदादा कर्डक यांच्या कवितेतील या ओळी
त्यातील शब्दांचा काल शब्दशः अनुभव घेतला.
भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन.
६ डिसेंबर या दिवशी दरवर्षी देशभरातून लाखो-करोडो भीमअनुयायी दादर चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी येत असतात.
यंदा ओखी वादळाची छाया आणि त्यामुळे पडलेल्या पावसाने शिवाजीपार्क आणि चैत्यभूमीपरिसरात जमणाऱ्या भीमअनुयायांना नेहमीप्रमाणे परंतु थोडा जास्त त्रास सहन करावा लागला.नेहमीप्रमाणे यासाठी कि सरकार आणि पालिकाप्रशासनाच्या कृपने दरवर्षी भीमअनुयायांची पुरेशा मूलभूत सोयी-सुविधा अभावी कुचंबणा होतच असते.यावेळी पाऊस पडल्यामुळे त्यात आणखी भर पडली.
मूलभूत सोयी-सुविधांचा मुद्दा पाहिला तर यावेळी पिण्याचे पाणी (नळ) आणि फिरती शौचालये अजिबातच दिसली नाहीत.आपल्या जबाबदार आणि श्रेष्ठ हवामानखात्याने संबंधितांना अगोदरच सूचना दिलेल्या होत्या असे कळते.त्यापार्श्वभूमीवर भाजप सरकार आणि शिवसेनेच्यापालिकाप्रशासनाने दखल घेतली नाही ना त्यानुसार काही उपाय-योजना केल्याचे दिसले.याना मतदान करताना हा मुद्दा लक्षात ठेवा.
शिवाजीपार्क मैदानात सर्वत्र चिखलच चिखल दिसत होता.तो हटविण्यासाठी पालिकेने काहीही केले नाही.ना सरकारने केले.
परिसरात फ्लडलाईट्स नव्हत्या अंधुक प्रकाशात सरकारप्रशासन आपली न केलेली कामे आणि योगदान जाहिरातींचा रतीब लावून सांगताना दिसली. शिवाजी पार्क परिसरात एवढ्या मोठ्याप्रमाणार जनसमुदाय उपस्थित होत असतो हे दरवर्षीचे आहे त्यामुळे त्याची आगाऊ सूचना देण्याची काहीएक गरज नसते.सरकारमध्ये पालिका प्रशासनामध्ये असणारे लोक काही दुधखुळे आहेत असेही म्हणता येत नाही.
तरीही त्यांचा बोऱ्या वाजला.अर्थात हे दुधखुळे नसून यांनी हे जाणीवपूर्वक गैरसोय होईल असे पाहिले आहे.कारण आंबेडकरी जनतेला जेवढा त्रास देता येईल तेवढा देण्यात याना आसुरी आनंद मिळत असतो.
नंतर पालिकेच्या शाळांमध्ये व्यवस्था करून वेळ मारून नेण्याचा कांगावा भाजपसरकार आणि शिवसेनेच्या पालिकाप्रशासनाने केला.
१ जून २०१७ रोजीच्या एका वृत्तपत्रातील बातमीनुसार हवामानखाते दररोज किती पाऊस पडेल याची माहिती सरकार आणि पालिका प्रशासनाला देणार असल्याचे कळते या अगोदर ८ दिवसांच्या पावसाचा अंदाज हवामानखात्याकडून देण्यात येत होता.याचा अर्थ याना पावसाचा अंदाज नव्हता असे म्हणता येत नाही.जूनच्या पावसात तुंबलेल्या मुंबईसाठी नियोजित दौरा रद्द करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पलिकेच्या कंट्रोलरूममध्ये दाखल झाले होते.अर्थात हे सेने-भाजप मधील कुरघोडी आणि शह-काटशह देण्याचे राजकारण.मात्र आंबेडकरी जनतेला आम्ही अमुक केले तमुक केले म्हणून भरमसाठ जाहिरातींचा रतीब घालणाऱ्या सरकरने आणि मुख्यमंत्र्यांनी ५ डिसेंबरला शिवाजीपार्क परिसरला भेट का दिली नाही? परिस्थितीचा आढावा का घेतला नाही?
पुरेशा सुविधा उपलब्ध आहेत कि नाही हे का पाहिले नाही?
पिण्याच्या पाण्याचे नळ नव्हते ना फिरते शौचालय मात्र ठिकठिकाणी नाक्यानाक्यावर भाजप सरकारच्या जाहिरातीसांठी जनरेटरसहित डिजिटल जाहिराती दाखविणारे ट्रक्स मात्र उभे दिसले.
पालिकेचा बजेट ५ करोड आहे.तसेच स्टॉलधारकांकडून ५ हजार भाडे वसूल केले जाते. असे कळले मात्र त्याप्रमाणत पालिकेने काहीही सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्याचे दिसले नाही.दरवर्षी पालिकेचे कर्मचारी शिवाजीपार्कवर स्वच्छता करताना दिसत तेही यावेळी कुठेच दिसले नाहीत.भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी अशाप्रकारे आपली "जात" दाखवली.
मुंबईस्पिरिटबद्दल काही बोलणार नाही हि रिकाम्या यडबंबू आणि विशेषतः मुंबईबाहेरील लोकांनी पसरवलेली अफवा आहे.माझा उभा जन्म गेला मुंबईत तेव्हा मुंबईस्पिरिट हे बारमधील स्पिरिटच्या बाटलीशिवाय कुठेही दिसले नाही.नैसर्गिक आपत्तीच्यावेळी जी काही मदत होते ती देशात विदेशात सर्वत्रच स्थानिक लोक आपल्यापरीने करत असतात.त्याला कुणी स्पिरिटबिरीट म्हणत नाही.
मात्र दादरच्या स्थनिक लोकांनी दाखवलेल्या मानवतेची झलक तीला जगात कुठेच तोड नाही.त्याचबरोबर शिवाजीपार्कला खेटून असणाऱ्या बंगल्यात मराठीमाणसाचा कैवार घेणाऱ्या पक्षाचा एक नेता असूनही त्याने शिवाजीपार्कवर जमणाऱ्या या तमाम मराठी माणसांसाठी आपल्या बंगल्यात किंवा ओट्यावरही जागा दिली नाही ना आपल्या कार्यकर्त्यांना मानवतावादी सेवा करण्याचे "आदेश"दिले.हि मराठी जनता त्यांच्यासाठी केवळ निवडणुका आल्या की जवळ करण्याची आणि झेंड्यात रंगापुरती वापरण्यासाठीची बाकी वेळी ते "अस्पृश्य" आणि टिंगलीचा विषय.
तुम्हाला लोकांना वाटले असेल सोयी-सुविधा पुरवल्या नाहीत तर हा समाज पुढच्यावर्षी यायचे टाळेल.या भ्रमात राहू नका.गेली ६१ वर्षे सोयी-सुविधांचा अभाव असताना दरवर्षीच लाखोंची गर्दी होती.ज्याने तुमच्या छातीत धडकी भरते.असो देशभरातून येणारी आंबेडकरी जनता सरकार,प्रशासनाच्या मदतीच्या भरवशावर बाबासाहेबांना अभिवादन करायला नतमस्तक व्हायला दादरला येत नाही.हे उद्गार आहेत वयवर्षे ७१ असणाऱ्या झुणकाबाई बोराटे यांचे ज्या विदर्भातून आल्या होत्या.
एवढ्या गर्दीत त्या मैदानात एके ठिकाणी बसल्या होत्या कपड्यांची बोचकी अन कडाक्याची थंडी बाधू नये म्हणून मांडीवर साडीत गुंडाळून झोपवलेली ३ वर्षाची नात ते दृश्य पाहून त्यांच्याशी संवाद साधण्याची इच्छा रोखता आली नाही.तेव्हा समजलं त्यांना मुलगा नाही.मुलगी आणि नात याना घेऊन त्या आलेल्या.आणि त्या अशाच दरवर्षी येत असतात.कोणत्याही अडचणींना नैसर्गिक आपत्तींना न डगमगता घाबरता त्या येत असतात आणि पुढेही येत राहतील आम्हा तरुणांना लाजवणाऱ्या आणि ऊर्जा भरणाऱ्या अशा तमाम वादळांना सलाम !!
यावेळी आणखी एक विशेष उल्लेखनीय बाब घडली ती म्हणजे कुठेच डीजे किंवा स्पिकर्स लावून गाणी वाजवली गेली नाहीत.
त्यामुळे महापरिनिर्वाण दिनी जे धीरगंभीर आणि जबाबदारीचे वातावरण अपेक्षित होते ते जाणवत होते.पाऊस किंवा कार्यकर्त्यांचे प्रयत्न असोत यावर्षी जत्रेचे स्वरूप संपुष्टात आले ही त्यातल्या त्यात एक समाधानाची बाब.
नेहमीप्रमाणे चळवळीतील सहकारी मित्रांची भेट झाली.ही एक ऊर्जा देणारी बाब असते.आपण सर्व एका परिवाराप्रमाणे जोडले गेलो आहोत.आणि या दरम्यानच्या काळात मी काय काय मिस केले याची जाणीव मला झाली.आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी ज्याप्रकारे तनमनधनाने नैसर्गिक आपत्तीला तोंड देत समाज बांधवाना मदत केली त्या ज्ञातअज्ञात तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार.
चैत्यभूमी ही ऊर्जाभूमी आहे कितीही वादळ-वारा पाऊस आला तरी समुद्राशी स्पर्धा करणारी ही सम्यक सम्बुद्ध गर्दी आटणार नाही.ती दिवसेंदिवस वाढत आहे वाढतच राहील.
जयभीम !!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Translate