६ डिसेंबर १९५६ रोजी एक धगधगता ज्वालामुखी अरबी समुद्राच्या काठावर शांत झाला.
दिल्ली २६ अलीपुर रोड या निवासस्थानावरून त्यांचे पार्थिव विमानाने रात्री सव्वा तीन वाजता मुंबईला आणण्यात आले. विमानातून डॉक्टर बाबासाहेबांचे पुष्पाच्छादित पार्थिव बाहेर येताच विमानतळावर उपस्थित असलेल्या हजारो स्त्रि-पुरुषांना रडू कोसळले दु:ख अनावर झाले.वातावरण अतिशय शोकाकुल आणि गंभीर असल्यामुळे उपस्थितांपैकी कुणीतरी सूचना केली कुणीही कोणत्याही घोषणा देवू नयेत.आणि सांताक्रूझ येथून मूक मोर्चाला सुरुवात झाली.
बाबासाहेबांचा चेहरा दिसावा म्हणून अम्बुलंसमध्ये खास प्रकाशयोजनेची व्यवस्था करण्यात आली होती.सांताक्रूझ ते दादर हे पाच मैलांचे अंतर हजारो मैलाचे वाटू लागले होते.इकडे राजगृहाजवळ लाखो लोक रात्रीच जमायला सुरुवात झाली होती.त्यावेळी मोबाईल नव्हते इंटरनेट नव्हते टेलिफोनही नव्हते आणि तरीही बाबासाहेबांच्या मृत्यूची खबर देशभर वाऱ्याच्या वेगाने पसरली.देशभरातून आणि महाराष्ट्राच्या खेडोपाड्यातून लोक मिळेल त्या वाहन साधनाने दादर गाठत होते.एकमेकांना धीर देत होते. हे एक अभूतपूर्व कोडेच. जमलेले लोक सतत बुद्धम शरण गच्छामि म्हणत हात जोडून प्रार्थना करत होते.अन्नपाण्यावाचून बसलेल्या लोकांच्या डोळ्यातून धारा मात्र थांबत नव्हत्या.
ज्याने हजारो वर्षे गुलामगीरीच्या अमानवीय अस्पृश्यतेच्या शोषणाच्या आणि माणुसकी नाकारणाऱ्या धर्म व सामाजीक अशा व्यवस्थेला सुरुंग लावत पशुवत आयुष्य कंठनाऱ्या शुद्राती शूद्रांना माणसात आणले.आज तो लाखोंचा पोशिंदा मार्गदाता शांत झाला होता.चिरनिद्रा घेत होता.
खरेतर ज्यांच्या स्पर्शाने सावलीने विटाळ होतो अशा खुळचट आणि बालिश रूढी प्रथा पाळणाऱ्यांच्या धर्माचा आणि सामाजीक व्यवस्थेलाच मोठ्या करुणामय अंतकरणाने शुद्ध केले. अशा महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा हा महापरिनिर्वाण दिन.करोडो भारतीयांच्या आयुष्यातील एक दु;खद दिवस.
एका युगपुरुषाच्या युगाचा अंत झाला .
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्रखर देशभक्त.म्हणून जेव्हा घटना लिहायला इथल्या विद्वान आणि गुणी अशा बुद्धिमत्तेच्या कुलुपाच्या चाव्या ज्यांच्या कमरेला लटकलेल्या असायच्या अशा लोकांनी जेव्हा भारतीय राज्यघटना लिहायला नकार दिला.परदेशी घटनातज्ञ व्यक्तीने कंत्राटी पद्धतीने घटना लिहिली असती तर देशावर नामुष्की ओढवली असती. असे घडू नये म्हणूनच देशाची बदनामी टाळण्यासाठी त्यांनी भारताची राज्यघटना लिहिली.
प्रचंड बुद्धिमत्ता फर्डे वक्ते आणि सर्वसमावेशक अशी दूरदृष्टी असलेला नेता भारताला लाभला हा भारताचा बहुमान.
बाबासाहेबांच्या ज्ञानाच्या कक्षा परीपेक्ष हे फार उत्तुंग आणि मोठे होते.
आज महाराष्ट्र आणि देशही दुष्काळाच्या चिंतेने व शेतकरी बांधवांच्या आत्महत्येने हळहळतो आहे. बाबासाहेबांनी १९३८ सालीच यावर उपाययोजना सुचवल्या होत्या. स्वतंत्र मजूर पक्षाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी “खोती” पद्धत बंद करणारे बिल कायदेमंडळात दाखल करून ती पूर्णतः बंद केली.त्या वर्षीच्या “जनता”च्या अंकात बाबासाहेबांनी यावर संदर्भात एक लेखच लिहिला होता.”शेतकरी बंधुनो तुमची दु:खे अनेक आहेत.ती दूर करण्यासाठी तुम्हीच कंबर कसली पाहिजे.शेतकर्याच्या मानेभोवतालचे सावकारी पाश दूर करण्याकरिता आणि सावकारशाहीस आळा घालणारेदुसरे बिल आम्ही मंत्री मंडळात सादर करणार आहोत.तुमच्या सामाजीक भेदाचा फायदा घेऊन तुंचे शत्रू तुमची एकी होऊ देणार नाहीत.तरी याबाबतीत कुणबी,मराठे,महार,चांभार, वगैरे सर्वांनी शेतकरी तेवढा एक आहे,असे समजून आपल्या हिताच्या आड कुणाला येवू देवू नका.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठीहि उपाय सुचविताना बाबासाहेबांनी सांगितले कि “शेती हा राष्ट्रीय उद्योग असेल,सामुहिक शेती (कलेक्टीव्ह फार्मिंग)करावी लागेल.शेती विमा,नदीजोड प्रकल्प,दामोदर व्ह्याली योजनेच्या माध्यमातूनच पुढे त्यांनी भाक्रानांगल योजना तयार केली.बाबासाहेबांच्या या कृषीविषयक योजनांची इमानदारीने अमलबजावणी केली तर शेतकर्याच्या आत्महत्येचा प्रश्नच निर्माण होणार नाही.
राजकीय दुष्टीकोनातून त्यांनी इंग्लंडमध्ये १९३१ साली गोलमेज परिषदेत अस्पृश्य समाजाच्या स्वतंत्र मतदार संघाचा मुद्दा जोरकसपणे लावून धरला.आणि मतदार संघ पासहि करून घेतला,मात्र त्यावेळीमहात्मा गांधीना हि कृती समजली नाही त्यामुळे त्यांना हे हिंदू धर्माचे विभाजन वाटले त्या चुकीच्या अर्थातून त्यांनी त्या विरोधात आमरण उपोषण केले.गांधीजींच्या या उपोषण दबावामुळे एक समझोता झाला.आणि स्वतंत्र मतदार संघाऐवजी अस्पृश्यांना आरक्षित जागा देण्यात आल्या.त्यालाच “पुणे करार” असे म्हणतात.या कराराप्रमाणे अस्पृश्यांना आपला उमदेवार निवडण्याचा अधिकार संपुष्टात आला.सर्वच मतदारआरक्षित जागेसाठी मतदान करून आपला प्रतिनिधी निवडू लागले.
यामुळे अस्पृश्य समजाच्या आयुष्यात जी संभाव्य सर्वांगीण क्रांती निर्माण होणार होती ती झाली नाही.
परंतु बाबासाहेब हार माननार्यापैकी नव्हतेच त्यांनी आरक्षणाची तरतूद करून मागासवर्गीय समूहांच्या हक्कअधिकाराचे रक्षण केले.आज आरक्षणाचा विषय अनेकदा चर्चेला येत असतो,गंमत म्हणजे जे आरक्षण लाभार्थी समूह आहेत तेही अज्ञानातून आरक्षण संकल्पनेला विरोध करत असतात.वास्तविक सर्वात जास्त आरक्षण मिळविणारा वर्ग हा ओबीसी आहे.आणि तरीही हा वर्ग कधी त्याच्या विरोधात असतो तर कधी उदासीनतेमुळे आणि जातीय दृष्टिकोनातून आरक्षण लढ्यात उतरत नाही.आणि ज्यांना केवळ साडेतीन पूर्णाक टक्के आरक्षण आहे तो आंबेडकरी समाजाच सर्वात जास्त संवेदनशील आणि जागरूक होवून रस्त्यावर उतरताना दिसतो आहे.
बाबासाहेब धर्माराच्या मुद्याबाबत अत्यंत संवेदनशील होते गंभीर होते.धर्मांतरासंबंधी त्यांनी केलेली मीमांसा लक्षणीय आहे.ते मुक्ती कोन पथे या अग्रलेखात म्हणतात “धर्मांतर हा मौजेचा विषय नाही.हा प्रश्न माणसाच्या जीविताच्या साफल्याचा प्रश्न आहे.जहाज एका बंदरातून दुसऱ्या बंदरात नेण्याकरीता नावाड्याला जेवढी पूर्व तयारी करावी लागते तेवढीच पूर्व तयारी धर्मातरा करिता करावी लागणार आहे.” धर्म आणि धम्म याची तुलना करताना ,जिथे धर्म संपतो तिथून धम्म सुरु होतो.धर्माचा संबंध देवाशी आहे तर धम्माचा संबंध मानवाशी आहे.दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर धर्मात देवाला स्थान आहे तर धम्मात मानवाला केंद्रबिंदू मानले आहे.धर्माची संकल्पना देवाशिवाय पूर्ण होत नाही तर धम्माच्या संकल्पनेत त्या व्यवस्थेला स्थानच नाहीं.धर्माच्या संकल्पनेत “ईश्वर” आणि “आत्मा” अटळ आहेत.
याशिवाय धर्म संकल्पना पूर्ण होत नाही,मात्र धम्मामध्ये “ईश्वर” आणि “आत्मा” यांचे अस्तित्वच नाकारलेले आहे.यासंदर्भात “धम्मचक्क प्रवर्तनसुत्त”म्हणून प्रसिद्ध असलेल्या आपल्या पहिल्याच उपदेशात बुद्ध म्हणतात.”आपला जो मार्ग आहे जो धम्म आहे,त्याला ईश्वर आणि आत्मा यांच्याशी काहीही कर्त्यव्य नाही,त्याचा मरणोत्तर जीवनाशी कसलाही संबंध नाही,तसेच धम्माचा कर्मकांडाशी काही संबंध नाही” बुद्धाचा हा विचार अथवा त्याचा धम्म हा केवळ हिंदू धर्मावर इलाज नाही तर जगातील सर्वच “धर्म” म्हणून ज्या सन्कल्पना आहेत त्या समग्र संस्थेवरील अंतिम इलाज आहे.ज्यामध्ये केवळ मानावाचे हित पाहिले गेले आहे.यामुळे खुप अभ्यास आणि विचारांती तर्काच्या आणि बुद्धीच्या कसोटीवर टिकणारा धम्म बाबासाहेबांनी स्वीकारला आणि त्यांच्या अनुयायांनाही त्याची १९५६ साली दीक्षा दिली.त्यानंतर लगेचच बाबासाहेबांचे महानिर्वाण झाले.बाबासाहेबांना जावून आज ५९ वर्षे झाली.त्यानंतर त्यांचा पोरका झालेला समाज व्यक्तिगत पातळीवर संघर्ष करून प्रगती साधतो आहे.राजकीयदृष्ट्या अतिशय वाईट अवस्था असताना अतिशय चिवटपने स्पर्धेत टिकून राहणे हे तो शिकला आहे.परंतु काही गोष्टी या सरकार पातळीवरच शक्य होत असल्यामुळे आणि राजकीय नेतृत्व सक्षम नसल्यामुळे अनेक गोष्टीत काही ठिकाणी या समजाला अडवणूक सहन करावी लागते आहे.प्रसारमाध्यमे आणि इथली प्रस्थापितव्यवस्था मुद्दाम असे नेतृत्व सतत पुढे करतो कि ते समजाला न्याय देवू शकणार नाही.संसदेत जेव्हा आपले म्हणने समाजाचे प्रश्न आणि व्यथा मांडायची वेळ येते तेव्हा समाजाचे नेतृत्व म्हणून तिथे गेलेले लोक विधायक गोष्टीवर बोलण्यापेक्षा कविता बोलून उपस्थितांचे मनोरंजन करत असतात,हे अत्यंत घातक आणि लाजिरवाणे आहे.आपल्याला मिळालेल्या संधीचा उपयोग अशा पद्धतीने वाया घालवला तर आपल्याला पुन्हा समाजात जावून कोणत्या तोंडाने मत मागण्याचा पाठिंबा मागण्याचा अधिकार उरतो याचा संबंधित नेतृत्वाने विचार करायला हवा.बाबासाहेबांचे इंदुमील मधील स्मारक ,इंग्लंड मधील स्मारक यांचे भावनिक भांडवल करत दोन्ही आघाड्यांनी आंबेडकरी जनतेला खेळवले आहे.वास्तविक आता आंबेडकरी जनतेनेच सांगायची गरज निर्माण झालेली आहे कि आम्हाला जगातील सर्वात मोठे पुतळे आणि स्मारके बागा प्रेक्षणीय स्थळे नको आहेत.आम्ही भावनिक बनून भक्त म्हणून जगत नाही.. आंबेडकरी जनता विवेकवादी आहे,विचारी आहे.
बाबासाहेब हे विश्व वंदनीय आहेत सिम्बॉल ऑफ नॉलेज आहेत तशा अनेक पदव्या त्यांना विदेशातून मिळाल्या आहेत आणि मिळत आहेत,परदेशातही त्यांचे पुतळे आहेत.त्यांच्या उत्तुंग कामाची देश-विदेशात दखल घेतली जात आहे.आता गरज आहे ती मुलभूत हक्क अधिकारांची.सरकार त्यावर खर्च करत नाही मात्र स्मारक पुतळे उभारून भक्तसंप्रदाय वाढवत आहे.
एकीकडे आरक्षण संपविण्याचे कारस्थान चालू आहे तर दुसरीकडे सरकारी शाळा-कॉलेज मोठ्याप्रमाणावर बंद केले जात आहेत.खाजगी शिक्षणसम्राटाना शिक्षण क्षेत्रात घुसखोरी करून शिक्षण महाग केले जात आहे.
केजी ते पीजी पर्यंतचे शिक्षण हे खरे तर मोफत दिले गेले पाहिजे.परंतु असे होताना दिसत नाही,
दिवसेंदिवस वाढत जाणारी महागाई आणि औषध-उपचारावर होणारा भरमसाठ खर्च हे सर्व पाहता इंदुमिलच्या ठिकाणी सर्व सोयीनी युक्त असे गरिबांसाठी सरकारी सुसज्जहॉस्पिटल किंवा केंब्रीज ऑक्सफोर्डच्या धर्तीवरील मोठे सर्व शाखांचे असे सरकारी महाविद्यालय निर्माण केले पाहिजे.याद्वारे बाबासाहेबांच्या उर्वरित कार्यासही हातभार लागेल आणि या माध्यमातून त्यांची स्मृती निरंतर राखली जाईल.
क्रांतीसुर्याच्या चिरतरूण वैचारिक चळवळीस विनम्र अभिवादन !! जयभीम !!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा