गुरुवार, २९ ऑक्टोबर, २०१५

धर्माज्ञा आणि धर्मद्रोह



माझा जन्म आणीबाणीत झाला नाही.त्या आगोदरही झाला नाही.
म्हणजे थोडक्यात काय तर मी आणीबाणी अनुभवलेली नाही.तीच्या झळाही सोसलेल्या नाहीत.
या अनुषंगाने वेदकाळात जी दाहक अस्पृश्यता होती,ती मी किंवा माझ्या पिढीने म्हणजे आजच्या पिढीने अनुभवलेली नाही.
त्या संदर्भात जे काही साहित्य अनुभव पुरावे वर्णन आहे त्यानुसार आपण अनुमान लावू शकतो.
आणि काय प्रकारची दाहकता असेल हे समजू शकतो.

त्याकाळी अस्पृश्यता हि समाजमान्य झाली,काही जाती बहिष्कृत केल्या गेल्या.सावर्जनिक पाणवठ्यावरील पाणी पिण्याचा हक्कही काढला गेला होता.तेव्हा शिक्षा हि वेदात मनुस्मृतीत असलेल्या कायद्यानुसार दिली जात असे.
तेव्हा पोलीस न्यायालय नव्हते मग फिर्याद केसेस वगैरे भानगडही नव्हती.

यासर्वाना आधार होता तो सनातन धर्म आणि त्याची समाजमान्य रूढी संकल्पना.
“धर्माज्ञा” आणि “धर्मद्रोह” हे कायद्याचे शब्द होते.कायदा मोडला तर धर्मद्रोह आणि त्याला शिक्षा म्हणून धर्माज्ञा.
धर्मद्रोह आणि धर्माज्ञा काय आहे तीचे नियम काय आहेत हे ठरविणारे विशिष्ट लोक होते.

त्यांनी नियम बनविले नियमास अपवाद म्हणजे व्यत्यासही राखून ठेवले.स्वत:साठी सर्व जागा सुरक्षीत करून ठेवल्या. उर्वरित समाजाने ते मान्य केले.धर्माज्ञा मोडणारे बहिष्कृत केले गेले. कुणी विरोध करू नये म्हणून धर्माज्ञा मोडणे
म्हणजे धर्मद्रोह देव आपल्यावर आणि समाजावर कोपेल अशी भीती घातली गेली.तेव्हाहि भारताला म्हणजे इथल्या समाजाला आपण करत असलेल्या अमानवीय कृत्यासाठी आपल्याला जग काय म्हणेल याची पर्वा नव्हती.

आज पुन्हा 'धर्माज्ञा' आणि 'धर्मद्रोह' हे शब्द कायद्यासंबंधी आधारभूत झालेले दिसत आहेत.
आजही भारताला "जग काय म्हणेल" याची फिकीर नाही.आमच्या धर्माला हेच मान्य आहे. आमच्या धर्मात असे लिहिले आहे.
आमच्या धर्मात विशिष्ट गोष्ट निषिद्ध आहे. म्हणून काही लोकांचा जमाव आक्रमक आहे.त्यांच्या भूमिका अनेकांना नाही परंतु बहुतेकांना पटलेल्या दिसतात.असे मानणाऱ्यात जात श्रेष्ठ-कनिष्ठ असा भेद नाही.

कारण अशा धार्मिक कायद्याची थेट झळ त्यांना पोहोचत नाही. कारण तुम्ही जात उतरंडीत जेवढ्या वरच्या पायरीवर तेवढी सुरक्षितता जास्त लाभली जाणार.त्याकाळी अस्पृश्यता समाजमान्य झाली ती बहुधा याच कारणासाठी झाली असावी.
जे अस्पृश्य नव्हते त्यांना भरडले जाण्याचे सोयरसुतक नव्हते तर धर्माज्ञा कशी पाळली जाईल
याबद्दल काळजी होती. आणि ती काळजी ते इमानेइतबारे वहात होतेच.

त्यामुळे या अनिशिष्ट रूढी संकल्पना मोडणे लोकांना गरजेचे वाटत नव्हते.
गुलामगिरी हि धार्मिक अनुशासनाचाच एक भाग आहे असा सार्वत्रिक समज होता.
यासाठी “गुलामाला गुलामगीरीची जाणीव करून द्या मग तो बंड  करून उठेल” असे म्हणले गेले.

आज चित्र काहीसे असेच रेखाटले जात आहे सध्या कॅनव्हासवर आउट लाईन मारलेली आहे.
काही पॉइंट निश्चित केले जात आहेत. हे बिंदू रेखाटले कि चित्र जोडणे सोयीचे होईल.यानंतर त्यात हळूहळू उष्ण रंग भरले जातील उष्मा वाढविणारा हा रंग स्वाभाविकपणे केसरी लाल असेल.जेव्हा चित्र पूर्ण रूपाने तयार होईल  तेव्हा ते भयावह असेल थरकाप उडविणारे असेल.हळूहळू इतर कायदे जोडल्या जातील पुन्हा त्या नवनवीन कायद्यांना
इथले समाजमन पुन्हा मान तुकवेल.जे भरडले जाणारे नाहीत त्यांना पुन्हा सोयरसुतक नसेलच.

असेही अस्पृश्यता कायद्यापुरती गेली तरी ती देशातून आणि इथल्या विराट समाजमनातून समूळ गेलेली नाही
नष्ट झालेली नाही. ती दिवसाआड अधूनमधून तिचे दाहक अस्तित्व जाणवून देत असतेच.
हे सगळे २१ व्या शतकातही चालू शकते त्यामुळे जगाची आपल्याला भीती नाही.आपण विराट आहोत. त्यामुळे पुन्हा व्यापक प्रमाणावर बहिष्कृतता इथे फोफावली आणि समाजमान्य झाली तर तशी ती होणारच नाही याची शाश्वती देता येत नाही.

जास्तीचा खर्च होतो म्हणून सरकार तर्फे देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा बंद करण्याचा सपाटा सुरु आहे.
या विरुद्ध कुणी आवाज उठवत नाही असे काही घडतेय हेच कुणाच्या लक्षातही येत नाही.
हि अघोषित आणीबाणी आहे. जी आता दृश्य स्वरूपात आपल्याला दिसत नाही.आणीबाणीत नागरिकांचे मुलभूत हक्कच काढण्याचा प्रयत्न अगोदर केला जातो.त्या एकदा काढून घेतल्या कि लोक गांगारून जातात.
सर्व सामान्य लोकांचा संघर्ष हा दररोजच्या जगण्या-मरण्याशी असतो.इतकाच तो मर्यादित आहे. माझी चूल कशी पेटेल यावर त्याचे अधिक लक्ष असते.त्यामुळे चुहूबाजुनी झालेला मारा तो सहन करू शकत नाही.

समाजसुधारकांच्या हत्या हा जुना विषय झाला.आणि तो पचविला देखिला गेलाय असे समजायला हरकत नाही.
कर्नाटकातील एका २३ वर्षीय लेखकास धर्मावर टीका केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली जाते.
बेंगलोर स्थित एक फिल्म अभिनेत्रीस बलात्कार आणि खुनाची धमकी दिल्या जाते.साहित्य अकादमी आणि साहित्यिक यांनी निषेध आणि पुरस्कार परत करण्याचे थांबत नाही तोच चित्रपट क्षेत्रातील लोक या असहिष्णू वातावरणाचा निषेध करत पुरस्कार परत करतात.या घटना  आणीबाणी  आणि असहिष्णू वातावरणाशी संबंधित नाहीत.

सगळे छान चाललेय शांत वातावरण आहे असे जर कुणी समजणार असेल तर तो मूर्खपणा
आणि अज्ञानच म्हणले पाहिजे.याविरुद्ध जर सर्वांनी एकजुटीने यल्गार पुकारला नाही विरोध केला नाही तर
येण्यार्या दिवसात वातावरण यापेक्षा वाईट झालेले असेल.
आणि तेव्हा आपल्या हातात काही उरलेले नसेल हे संबंधीतांनी खुणगाठ बांधून लक्षात ठेवावे.

- मिलिंद धुमाळे 

पूर्व प्रकाशित दैनिक मी मराठी 








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Translate